
बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांचं निधन दुबईत झालं होतं. त्या एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तिथे गेल्या होत्या. दुबईत त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याच हॉटेलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या कारणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत होत्या. त्यामुळे त्या त्यांच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत होत्या. परंतु त्यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा कठीण डाएट फॉलो करण्यास मनाई केली होती.
श्रीदेवी यांनी कठोर डाएटमुळे आपला जीव गमावला, अशीही चर्चा होती. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे पती बोनी कपूर यांचीही पोलिसांनी चौकशी केली. काही वर्षांपूर्वी ‘द न्यू इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी यावर मोकळेपणे भाष्य केलं होतं. त्यात ते म्हणाले होते, “श्रीदेवी अत्यंत कठीण डाएट फॉलो करत होती, ज्यामध्ये ती मीठसुद्धा खात नव्हती. यामुळे कधी कधी तिला चक्करसुद्धा यायची. तो एक नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर तो अपघाती मृत्यू होता. मी त्याबद्दल काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण जेव्हा माझी चौकशी केली जात होती, तेव्हा जवळपास 24 ते 48 तासांपर्यंत मी त्याविषयी बोलत होतो.”
“सुंदर दिसण्यासाठी ती अनेकदा उपाशीच राहायची. श्रीदेवीला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आमच्या लग्नाच्या वेळीही तिला चक्कर आली होती. तिच्या जेवणात सहसा मीठच नसायचं. मी त्याकडे इतक्या गांभीर्याने कधी पाहिलं नव्हतं आणि ही गोष्ट इतकी गंभीर ठरू शकते, याचाही मी कधी विचार केला नव्हता. निधनाच्या संध्याकाळीही तिला गरगरल्यासारखं झालं होतं. त्यामुळे ती तिच्या रुममध्ये आराम करण्यासाठी गेली होती. त्यानंतर जेव्हा ती रुमवर परतली, तेव्हा तिने फ्रेश व्हायचं ठरवलं आणि बाथरुममध्ये गेली”, असं त्यांनी पुढे सांगितलं. श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडून झाल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे.