Asha Bhosle : आशाताईंची ती इच्छा होणार पूर्ण, राज्य सरकारचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय!
आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

Asha Bhosle Died : गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अनेक अवयव निकामी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत. आज त्या आपल्यात नसल्या तरी याच गाण्यांच्या रुपात त्या कायम आपल्या सोबत असतील अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आशाताईंची ती इच्छा पूर्ण होणार आहे.
राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. आशाताईंनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रीमती भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.
2000 साली आशाताईंना दादासाहेब फाळके पुरस्कार
दरम्यान, आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 11 हजारांपेक्षाही जास्त गाणी गायली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल सिनेसृष्टीने घेतली. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांना एकूण 7 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी, मराठी, बांगला अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशाताईंनी दिल चीज क्या है, उडे जब जब जुल्फे तेरी, इन आँखोंकी मस्ती अशी अनेक अजरामर गाणी गायली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.