तरुणाच्या हत्येप्रकरणी स्वरा भास्करने संघावर साधला निशाणा; म्हणाली ‘हे भयानक, लज्जास्पद..’

दिल्लीतल्या उत्तमनगरमधल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. या घटनेप्रकरणी कशा पद्धतीचं राजकारण केलं जातंय, हे तिने या पोस्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तरुणाच्या हत्येप्रकरणी स्वरा भास्करने संघावर साधला निशाणा; म्हणाली हे भयानक, लज्जास्पद..
स्वरा भास्कर
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 10:31 AM

4 मार्च रोजी दिल्लीतल्या उत्तम नगरमध्ये 26 वर्षीय तरुण खाटिकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता अभिनेत्री स्वरा भास्करने याप्रकरणी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित राग व्यक्त केला आहे. स्वरा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडते. उत्तमनगरमध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी तिने आता ‘संघी इकोसिस्टीम’वर निशाणा साधला आहे.

स्वराने तिच्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘होळीदरम्यान मुस्लीम शेजाऱ्यांशी झटापट झाली आणि त्यात तरुण खाटिकाची हत्या झाल्यानंतर संपूर्ण संघी इकोसिस्टीम गोंधळ घालतोय. ही कहाणी खूप गुंतागुंतीची आहे. दिल्ली पोलिसांनी हे कन्फर्म केलंय की या शेजाऱ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. हिंदू कुटुंबातल्या मुलीने बुरखा घातलेल्या मुस्लीम महिलेवर पाण्याचा फुगा फेकला होता. त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. तिथे त्या तरुणानेही त्याच्या मित्रांना जिममधून बोलावलं आणि वाद आणखी वाढत गेला. तरुणाच्या डोक्याला मार लागून तो खाली कोसळला आणि त्याचे मित्र तिथून पळून गेले. दोन्ही कुटुंबाच्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तरुणाचा मृत्यू झाला. हे अत्यंत भयानक असून या मृत्यूकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.’

स्वरा भास्करचं ट्विट-

‘आता पहा, द्वेष पसरवणाऱ्या संघाच्या लोकांनी काय केलं.. त्यांनी मुस्लीम जमावाकडून हिंदू तरुणाची हत्या केल्याच्या बातम्या सर्वत्र पसरवल्या आणि हिंदू धोक्यात असल्याची घोषणा केली. पोलिसांनी दोषींना अटक केली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. इथे बजरंग दल, विश्व हिंदू परिषदसुद्धा निदर्शनं करू लागले आणि त्यांनी मुस्लीम कुटुंबाचं घर जाळून टाकलं. आंटीजी रेखा गुप्ता यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केला आणि आदेश दिले. त्यानंतर दिल्लीतल्या निजामुद्दीन परिसरातील मुस्लीम कुटुंबाचं घर बुलडोझने पाडण्यात आलं. संघाच्या लोकांनी याचा जल्लोष केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशाप्रकारे बुलडोझर चालवण्यावर बंदी आहे. दुसरीकडे मुस्लीम महिलेनं आरोप केले आहेत की फुगा फोडल्याच्या घटनेनंतर दारुच्या नशेत तरुणासह इतर मुलं आली आणि त्यांनी छेडछाड करत शोषण केलं. यावरूनच भांडणाची सुरुवात झाली होती’, असं तिने पुढे लिहिलं.

या पोस्टमध्ये स्वराने पुढे देशातील इतर काही घटनांची उदाहरणं दिली आहेत. कोणत्याही प्रकारे भडकावण्याचा प्रयत्न केला तरी तरुणाची हत्या व्हायला पाहिजे नव्हती. बाकीची कहाणी हा खालच्या पातळीच्या राजकीय संधीसाधूपणा आहे. आपण त्याला बळी पडू नये, असं तिने चाहत्यांना म्हटलंय. स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us