भारत जोडो यात्रेतील ती गोष्ट पाहून डोळे पाणावले…; किरण माने यांची पोस्ट चर्चेत

| Updated on: Mar 18, 2024 | 10:26 PM

Actor Kiran Mane on Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल सांगता झाली. या भारत जोडो यात्रेतील घटनेवर अभिनेते किरण माने यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेतील एका घटनेवर किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केलीय. वाचा...

भारत जोडो यात्रेतील ती गोष्ट पाहून डोळे पाणावले...; किरण माने यांची पोस्ट चर्चेत
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. मणिपूरपासून सुरु झालेली ही यात्रा मुंबईतील धारावीत थांबली. या समारोपानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावर अभिनेते किरण माने यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना काल चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करताना पाहून माझं मन भरून आलं. माझे डोळे पाणावले, असं किरण माने म्हणाले. तशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

किरण मानेंनी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी

तथागत बुद्धांनी वैदिकांचे वर्चस्व झुगारून स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मुल्यं या भुमीत रूजवली… बहराला आणली. नंतरच्या काळात कटकारस्थानानं ती चिरडून टाकून पुन्हा वैदिकांनी मनुस्मृती निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित केलं… डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळून पुन्हा बुद्धविचाराकडे या देशाला नेलं. तथागतांची स्वातंत्र्य-समता-बंधुता ही अनमोल मुल्यं संविधानात उतरवली. त्या जोरावर आपला भारत देश सर्वात मोठी लोकशाही म्हणून जगात सन्मानानं आणि रूबाबात उभा राहिला.

आज पुन्हा ती त्रिसुत्री पायदळी तुडवली जात असताना… ‘त्या’ विषारी विचारसरणीनं पुन्हा मानवतेचं नरडं आवळलेलं असताना… वर्चस्ववाद्यांच्या पिलावळीचा सोशल मिडीयावर, न्यूज चॅनलवर आणि बाहेरही अर्वाच्य, हिंसक ट्रोलींगचा थयथयाटी उन्माद सुरू असताना.. एकमेव माणूस या सगळ्याच्या विरोधात भक्कमपणे पाय रोवून उभा ठाकलाय. तो म्हणजे राहूल गांधी !

काल भारत जोडो यात्रेची सांगता करताना राहुल गांधी चैत्यभुमीवर नतमस्तक झाले ते पहाताना माझं मन भरून आलं… डोळे पाणावले…

क्रूर, कपटी, कारस्थानी हुकूमशहांच्या नजरेला नजर भिडवून या माणसानं आज अख्खा देश हलवून टाकलाय. ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स सगळ्या चौकशांच्या छाताडावर पाय दिलाय. बदनामीचा वर्षावाला पुरून उरलाय. काळानं त्याचं चारित्र्य चोवीस कॅरेट सोन्यासारखं लखलखून, झळाळून जगासमोर आणलंय.

‘काळ’ हा लै मोठ्ठा न्यायाधीश असतो भावांनो. सत्याला विजय मिळवूनच देतो. ज्याला मुद्दाम प्लॅनिंग करून पप्पू ठरवायचा प्रयत्न केला गेला, तो आज ‘देश की धडकन’ बनलाय… ज्याला ओढूनताणून अख्ख्या विश्वाचा गुरू ठरवायचा भिषण प्रयत्न झाला, त्याचे पुर्ण जगात हसे झालेय. बुरखा टराटरा फाटलाय. काळाचा महिमा !

ही निवडणुक नेहमीसारखी नाही. कालची सभा ही प्रचारसभा नव्हती. हा देश आणि बुद्धांची मुल्यं असलेलं संविधान वाचवण्यासाठी केलेला ‘क्रांती’चा एल्गार होता ! या ऐतिहासिक प्रसंगी पं. नेहरूंच्या आणि डाॅ. आंबेडकरांच्या वंशजांना त्यांचा विचार पुढं नेणार्‍या मंचावर एकत्र बघणं हा आयुष्यभर काळजात साठवून ठेवावा असा क्षण होता…

– किरण माने.