नाव ओढलं तर गप्प बसणार नाही..; भाजप प्रमुखांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, अखेर मागावी लागली माफी

अभिनेत्रीने रोखठोक भूमिका घेतल्यानंतर अखेर भाजप प्रमुखांना जाहीर माफी मागावी लागली. मला माझ्या वक्तव्याचा पश्चात्ताप असून मी माफी मागतो, असं ते म्हणाले आहेत. उच्च पदावर असलेल्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत, असं ती म्हणाली.

नाव ओढलं तर गप्प बसणार नाही..; भाजप प्रमुखांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, अखेर मागावी लागली माफी
Trisha Krishnan and Vijay
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2026 | 3:39 PM

तामिळनाडूचे भाजप प्रमुख नैनार नागेंद्रन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीनेही तीव्र संताप व्यक्त केला. नैनार यांनी ज्या अभिनेत्रीबद्दल टिप्पणी केली, ती त्रिशा कृष्णन आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्रिशा अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य केलं जाण्याची अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत त्रिशाने राग व्यक्त केला. तिने स्पष्टपणे सांगितलं की ती कोणत्याही प्रकारचा अनादर किंवा अपमानास्पद टिप्पणी सहन करणार नाही. आदराच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी थेट भूमिका तिने मांडली.

नैनार नेमकं काय म्हणाले?

अभिनयसृष्टीतून राजकारणात आलेल्या अभिनेता विजयची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. ते म्हणाले, “ज्या माणसाला छतावरही चढता येत नाही, तो स्वर्गात पोहोचण्याचं स्वप्न पाहत आहे. दुर्दैवाने तो खूपच भोळा आहे. त्याने आधी स्वत:च्या घरातून बाहेर पडावं. आधी त्रिशाच्या घरातून बाहेर पडावं, मग काहीतरी घडू शकेल.” या वक्तव्यातून नैनार यांनी थेट विजय आणि त्रिशाचं नाव जोडलं होतं.

या वक्तव्यानंतर त्रिशाने तिच्या वकिलांमार्फत तिची स्पष्ट भूमिका मांडली. तिच्या वकिलाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं. ज्यात म्हटलंय, ‘त्रिशा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि राजकारणाबद्दलची तिची भूमिका पूर्णपणे तटस्थ आहे. त्रिशाला केवळ तिच्या कामासाठी, चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखलं जायचं आहे, कोणत्याही राजकीय अफवांसाठी नाही. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावर एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याला चर्चेचा विषय बनवणं योग्य नाही. उच्च पदावर असलेल्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत, कारण त्यांच्या वक्तव्यांचा समाजावर प्रभाव पडतो. त्रिशाचं नाव तिच्याशी काहीही संबंध नसलेल्या प्रकरणांमध्ये ओढलं जाऊ नये.’

या पोस्टनंतर अखेर नागेंद्रन यांनी माफी मागली. ‘माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कोणत्याही वैयक्तिक टिप्पण्यांना परवानगी देत नाही आणि मीसुद्धा अशा प्रकारची टिप्पणी करत नाही. पण त्यादिवशी मी तो नियम मोडला. मी जे काही बोललो, त्याबद्दल मला पश्चात्ताप आहे. के. अन्नामलाई यांनीही मला समजावून सांगितलं. त्यामुळे मी माफी मागतो’, असं ते म्हणाले.