‘बिग बॉस 17’चा विजेता घोषित होण्यापूर्वी अंकिता लोखंडेसाठी विकीची खास पोस्ट; म्हणाला..

| Updated on: Jan 28, 2024 | 6:47 PM

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेपूर्वी विकी जैनने पत्नी अंकिता लोखंडेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीला नेहमीच भांडताना पाहिलं गेलं. हा शो संपल्यानंतर दोघं विभक्त होणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता विकीच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

बिग बॉस 17चा विजेता घोषित होण्यापूर्वी अंकिता लोखंडेसाठी विकीची खास पोस्ट; म्हणाला..
Vicky Jain and Ankita Lokhande
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 28 जानेवारी 2024 | जवळपास 105 दिवसांनंतर ‘बिग बॉस 17’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी पाच जण ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांचा समावेश आहे. फिनालेच्या एक आठवड्याआधी बिग बॉसच्या घरातून अंकिताचा पती विकी जैन बाहेर पडला. बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासूनच अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडणं पहायला मिळाली. इतकंच नव्हे तर बिग बॉस हा शो संपल्यानंतर दोघं विभक्त होणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता ग्रँड फिनालेच्या काही तास आधी विकी जैनने पत्नी अंकितासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अंकितासोबतचा फोटो पोस्ट करत विकीने लिहिलं, ‘आयुष्यातील चढउतारांचा आपण दोघांनी एकत्र सामना केला. अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याची तुझी वृत्ती प्रेरणादायी आहे आणि मला यात काहीच शंका नाही की आपल्या मार्गात जे काही येईल, त्याला तू अत्यंत कौशल्याने हाताळशील. मी तुझ्यासोबत आहे.’ बिग बॉसच्या घरातील अंकिता आणि विकीची भांडणं हा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण प्रवासात या दोघांच्या नात्यातील कठीण दिवस प्रेक्षकांना पहायला मिळाले. अनेकांनी विकीला ट्रोल केलं, तर काहींनी अंकितावरही टीका केली. ही भांडणं कधीकधी इतकी टोकाची झाली की अंकिताकडून अनेकदा घटस्फोटाचा उल्लेख झाला. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीची आईसुद्धा आली होती. दोघींनी आपल्या मुलांना काही सल्ले दिले. तेव्हासुद्धा ही जोडी चर्चेत आली होती.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत विकीने अंकिताविषयी वक्तव्य केलं होतं. “अंकिताने ट्रॉफी घेऊन घरी यावं अशी माझी इच्छा आहे. अंकिताच खरी विजेती आहे. कारण तिनेच खऱ्या भावना व्यक्त करत हा प्रवास अनुभवला आहे, हा खेळ खेळला आहे. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी आमच्याच घरी यावी”, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली होती.

बिग बॉसच्या घरातील शेवटचा एलिमिनेशनचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी बिग बॉसने अंकिता आणि विकीला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारला होता. “जोडीने या शोमध्ये भाग घेतल्याबद्दल कसं वाटतंय”, असा प्रश्न बिग बॉसने विचारला होता. त्यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली की, “माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. कारण मी घरात सर्वांशी लढले, पण माझ्या पतीसोबत हरले.” तर विकीने सांगितलं की बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो अंकितासोबतच्या नात्याला आणखी चांगल्याप्रकारे समजू शकला आहे. बिग बॉसमुळे लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांतच एकमेकांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली, असं म्हणत त्याने आभार मानले.