सेटवर अजय देवगणला अभिवादन केलं नाही म्हणून..; मोठ्या अभिनेत्याचा आरोप

'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शक अश्विनी धीर यांनी केलं होतं. 

सेटवर अजय देवगणला अभिवादन केलं नाही म्हणून..; मोठ्या अभिनेत्याचा आरोप
Ajay Devgn
| Edited By: | Updated on: Aug 19, 2024 | 1:42 PM

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाचं सध्या युकेमध्ये शूटिंग सुरू आहे. मात्र हा चित्रपट त्यातील कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. आधी संजय दत्तने या चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर आता विजय राजला या चित्रपटातून काढून टाकल्याचं कळतंय. विजयला त्याच्या वागण्यामुळे, सततच्या मागण्यांमुळे आणि सहकार्य न केल्यामुळे चित्रपटातून काढून टाकल्याचं निर्माते कुमार मंगत यांनी सांगितलं होतं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले होते. मात्र निर्मात्यांचे हे आरोप अभिनेता विजय राजने फेटाळले आहेत. चित्रपटातून काढून टाकण्यामागचं वेगळंच आणि सर्वांना थक्क करणारं कारण त्याने सांगितलं आहे.

काय म्हणाले निर्माते?

विजयला काढण्यामागचं कारण सांगताना निर्माते मंगत म्हणाले, “होय, विजय राजला त्याच्या स्वभावामुळे आम्ही चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी खरी आहे. त्याला राहायला मोठे रुम्स, व्हॅनिटी व्हॅन हवी होती. त्याने स्पॉट बॉइजसाठीही आमच्याकडून जास्त पैसे घेतले होते. त्याच्या स्पॉटबॉयला एका रात्रीसाठी 20 हजार रुपये मिळत होते. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याच्या स्पॉटबॉयला इतके पैसे दिले जात नाहीत. युकेतील शूटिंगचा खर्च अधिक असतो. शूटदरम्यान प्रत्येकाला चांगले रुम्स दिले गेले होते. पण त्याने ‘प्रीमिअर सुइट’ देण्याची मागणी केली. त्याचं सतत हेच म्हणणं होतं की तुम्ही मला भूमिका दिली आहे. मी तुमच्याकडे काम मागितलं नव्हतं. दिवसेंदिवस त्याचं वर्तन आणखी उद्धट झालं होतं. तीन जणांसाठी त्याने दोन कार मागितले होते.”

विजय राजची बाजू काय?

विजय राजने निर्मात्यांचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तो म्हणाला, “मी लोकेशनला वेळेच्या आधीच पोहोचलो होतो. तिथे मला भेटायला रवी किशन, कार्यकारी निर्माते आशिष, निर्माते कुमार मंगत आणि दिग्दर्शक विजय अरोरा आले होते. मी व्हॅनमधून बाहेर पडलो आणि अजय देवगणला पाहिलं. माझ्यापासून तो जवळपास 25 मीटर अंतरावर उभा होता. तो व्यस्त असल्याने मी त्याला अभिवादन केलं नव्हतं. त्याच्या पंचवीस मिनिटांनंतर निर्माते मंगत माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘तुम्ही हा चित्रपट सोडू शकता. आम्ही तुम्हाला काढून टाकतोय.'” विजयला जेव्हा त्याच्या मागण्यांविषयी विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “मला सकाळी योगसाधनेसाठी थोडीशी जागा हवी असते. या इंडस्ट्रीत 26 वर्षे काम केल्यानंतर मी मोठ्या रुमची मागणी करू शकत नाही का? माझ्याकडून झालेलं एकमेव गैरवर्तन म्हणजे मी अजय देवगणला अभिवादन केलं नाही. सेटवर पोहोचल्यानंतर तीस मिनिटांच्या आत मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. यामागचं कारण म्हणजे मी अजय देवगणची भेट घेतली नाही. ही लोकं खूप पॉवरफुल आहेत आणि गैरवर्तनाचा इथे प्रश्नच येत नाही.”

निर्माते कुमार मंगत यांना मात्र विजयने दिलेलं स्पष्टीकरण पटलं नाही. “विजय राज यांना चित्रपटातून काढून टाकल्याने आमचं दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अशा छोट्याशा कारणांसाठी आम्ही इतका मोठा निर्णय घेणार नाही. त्याचं वर्तन चुकीचं होतं”, असं ते म्हणाले.