
UK07 Rider म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस 17’ फेम अनुराग डोभालने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित प्रचंड मानसिक छळाला सामोरं गेल्याचा खुलासा केला होता. ज्या लोकांनी त्याचा छळ केला, त्यांच्या नावाचा खुलासा करणार असल्याचंही त्याने म्हटलं होतं. त्यानंतर आता त्याने युट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या स्वत:च्या आईवडिलांवर आणि भावंडांवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर हा अखेरचा व्हिडीओ असल्याचा दावा त्याने केला आहे. “गेल्या काही महिन्यांत माझं आयुष्य इतकं बदललंय की मला इतकं काही सहन करावं लागेल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती”, असं सांगत या व्हिडीओनंतर युट्यूब पुन्हा कधीच येणार नसल्याचं त्याने जाहीर केलं.
जवळपास दोन तासांच्या या व्हिडीओमध्ये अनुरागने त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा उल्लेख केला. वयाच्या 14 व्या वर्षी ब्रेन ट्युमरचं निदान, अभ्यासासाठी कुटुंबीयांचा दबाव आणि नंतर आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ट्युशन्स घेणं.. अशा विविध घटना त्याने सांगितल्या. “माझी पत्नी रितिकाशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. माझी चाहती म्हणून ती मला सतत दोन ते तीन वर्षे मेसेज करत होती. तेव्हा एकेदिवशी मी तिला रिप्लाय देण्याचं ठरवलं. लग्नाआधी आम्ही दोन वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. पण माझ्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. लग्नाच्या सहा दिवस आधी आईवडिलांनी लग्नाला येणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सगळी तयारी मलाच करावी लागली. माझ्याकडून हात जोडून घेतले, मला पाया पडायला लावलं, सर्व नातेवाईकांसमोर मला माफी मागायला लावलं. आईवडिलांनीच माझा इतका छळ केला. ना आम्ही खुश राहणार आणि ना तुला खुश राऊ देणार, असं ते म्हणाले. माझ्या आंतरजातीय लग्नाला त्यांचा विरोध होता. त्यांन लग्नानंतर मला आणि रितिकाला घरात प्रवेश करू दिला नव्हता”, असं सांगत अनुरागने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही खुलासा केला.
“माझ्या मृत्यूसाठी आई, वडील, भाऊ आणि श्रेया जबाबदार असतील. मला काहीच करण्यालायक त्यांनी सोडलं नाही. मी प्रचंड नैराश्यात आहे. ही भावना मनातून कशी काढून टाकू, हे मला कळत नाहीये. या व्हिडीओनंतर कदाचित मी गायब होईन. मला फक्त झोपायचं आहे. पाच दिवसांपासून मी जेवलो नाही, माझा मेंदू सुन्न झाला आहे. मी गेल्यानंतर कदाचित आई, वडील आणि श्रेया माझ्याबद्दल बरंच काही बोलतील, त्यात खोटंही असेल. पण मी चुकीचा नव्हतो. रितिका.. तुला बऱ्याच लोकांनी खोटं सांगितलं, पण मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलं आणि तुझ्यासाठी सर्वकाही केलं. पण तू दुसऱ्यांवर विश्वास ठेवलास आणि चुकीचा निर्णय घेऊन मला सोडून गेलीस. मी गेल्यानंतर किमान माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी सत्य बोल आणि आमची बाजू घे. आपल्या आदरासाठी लढ”, अशी कळकळीची विनंती त्याने पत्नीला केली.
अनुराग डोभालने गेल्या वर्षी मे महिन्यातच रितिकाशी लग्न केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात रितिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.