
Ahmedabad Plane Crash : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितादादांच्या अकाली निधनानंतर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या विमान अपघातानंतर विमान उड्डाणाचे नियम, आणि विमान प्रवासादरम्यानची सुरक्षा हे मुद्दे पुन्हा नव्याने चर्चेला आले. आता हा अपघात नेमका कसा झाला? त्यामागची कारणे काय आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असतानाच गेल्या वर्षी झालेल्या अशाच एका प्रवासी विमान अपघाताबाबत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. या विमान अपघातात पायलटने विमानाचे फ्युल कंट्रोल मुद्दामहून बंद केले होते, असा दावा केला जात आहे.
अहमदाबाद येथील 12 जून 2025 रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत हा दावा करण्यात आला आहे. विमानाने प्रवासासाठीह हवेत झेप घेतल्यानंतर पुढच्या अवघ्या काही सेकंदांत हे विमान कोसळले होते. एअर इंडिया कंपनीच्या या विमानाचे नाव बोईंग 878 ड्रीमलाईनर असे होते. या विमानातील फक्त एक प्रवासी बचावला होता. याच विमान अपघाताबाबत आता मोठा दावा केला जात आहे. इटलीच्या डेली कोरिएरे डेला सेरा या वर्तमानपत्रात हा विमान अपघात का झाला? याचं कारण सांगण्यात आलं आहे. या रिपोर्टमध्ये बोईंग विमान कपंनीला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वैमानिकानेच मुद्दामहून विमानाचे फ्यूल कंट्रोल स्विच बंद केले होते, असा खळबळजनक दावा यात करण्यात आला आहे.
अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या या अपघातात एकूण 241 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये फक्त एकाचा जीव वाचला होता. उर्वरित प्रवासी तसेच क्रू मेंबर्स मिळून एकूण 260 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला होता. सुरुवातीला इंजिनला पोहोचणाऱ्या इंधनाचा पुरवठा थांबल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर ते थेट एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर जाऊन आदळले होते.
दरम्यान, या विमानाच्या वैमानिकावरच थेट आरोप करण्यात आल्याने आता नव्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे डीजीसीएच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.