
Air India Suspended Flights : इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धामध्ये दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ला करताना दिसत आहेत. दुसरीकडे या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली असून हा देश इस्रायलला साथ देत आहे. प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील काही देशांत अमेरिकेची लष्करी तळं आहेत. या लष्करी तळांवर इराणनने हल्ले केले आहेत. त्यामुळे आता या युद्धाची परिस्थिती जास्त भीषण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भारताने खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन दुबई, दोहा, रियाद, तेल अवीव यासह इतरही काही महत्त्वाच्या शहरांमधील उड्डाण रद्द केले आहे. म्हणजेच या शहरांमध्ये एअर इंडिया कंपनीचे एकही विमान जाणार नाही. इस्रायलने इराणविरोधात चालू केलेल्या ऑपरेशन रेझिंग लॉयनमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार दुबई, अबू धाबी, सैदी अरेबिया, रियाद, जेद्दा, दम्माम इथे या कंपनीचे एकही विमान प्रवास करणार नाही. दोहा, ओमान, मस्कट, इस्रायल इथे जाणाऱ्या विमानांचेही उड्डाण थांबवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे भारत सरकारनेदेखील काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे. सरकारने काही हेल्पनाईन जारी केलेल्या आहेत. इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना मदत हवी असल्यास या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीनेदेखील ओमान, इस्रायल, मस्कट या भागात नेमकं काय चालू आहे, यावर आमचे लक्ष असल्याचे सांगितले आहे.