
बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून पाकिस्तानचा बांग्लादेशात वावर वाढला आहे. भारत-बांग्लादेश संबंधात विष कालवण्याचा पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न झाला. बांग्लादेशला आपल्याजवळ आणून भारताविरोधात त्यांचा कसा वापर करता येईल? याच दृष्टीकोनातून पाकिस्तानने पावलं उचलली. पण यापुढे असं होणार नाही. कारण बांग्लादेशात आता नवीन सरकार आलय. पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी आहे. जगात युद्ध सुरु असताना पडद्यामागे काही घडामोडी घडल्यात. तो पाकिस्तानसाठी एक झटका आहे. बांग्लादेशात फेब्रुवारी महिन्यात तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. बांग्लादेशच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजेंसचे (DGFI) प्रमुख मेजर जनरल मोहम्मद कैसर राशिद चौधरी यांनी दिल्लीचा ‘सीक्रेट’ दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मागच्या दोन वर्षांपासून दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध रुळावर आणण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. प्रथोमोलोने हे वृत्त दिलं आहे. जनरल चौधरी यांच्या दौऱ्याकडे भारतीय मिडिया आणि एक्सपर्टनी एक चांगलं पाऊल म्हणून पाहिलं आहे. या दौऱ्याची सार्वजनिकरित्या जास्त चर्चा झाली नाही. पण बांग्लादेशी अधिकाऱ्याचा हा सिक्रेट दौरा दिल्ली-ढाका संबंध सुधारण्याचा पाया ठरणार अशी चर्चा आहे.
भारत-बांग्लादेश संबंधात मोठी घसरण
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल करण्यात आलं. मोहम्मद यूनुस अंतरिम सरकारचे प्रमुख बनले. त्यानंतर भारत-बांग्लादेश संबंधात मोठी घसरण झाली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बांग्लादेशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीला सत्ता मिळाली. तारिक रहमान देशाचे पंतप्रधान बनले. त्यानंतर भारत-बांग्लादेश संबंध सुरळीत होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बांग्लादेशचे DGFI प्रमुख भारतात कोणाला भेटले?
ढाक्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारत आणि बांग्लादेश संबंध सुधारण्यावर जास्त लक्ष दिलं जात आहे. DGFI प्रमुखाचा भारत दौरा म्हणून महत्वाचा ठरतो. राशिद चौधरी यांनी अजित डोवाल यांच्याशिवाय भारताच्या गुप्तचर संस्थेचे RAW चे प्रमुख पराग जैन आणि सैन्य इंटेलिजन्स एजन्सीचे महासंचालक लेफ्टनेंट जनरल आरएस रमन यांची भेट घेतली.
बैठकीत काय ठरलं?
कुठल्या दुसऱ्या देशाविरोधात आपल्या भूमीचा वापर करु द्यायचा नाही यावर बैठकीत एकमत झालं. चौधरी यांच्या दौऱ्याची माहिती असलेल्या लोकांच्या हवाल्याने द प्रिंटने हे वृत्त दिलय. DGFI प्रमुखांच्या या दौऱ्याला अधिकृतरित्या मेडिकल विजिट सांगण्यात आलं होतं. बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा दौरा खूप महत्वाचा होता. बांग्लादेशसोबत संबंध बिघडले तर ईशान्येकडच्या राज्यातील शांतता धोक्यात येईल ही भारताला भिती आहे. म्हणून हा दौरा महत्वाचा आहे.