Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसेचा आगडोंब, दंगेखोरांनी हॉटेलमध्ये 8 जणांना जीवंत जाळले, तर हिंदू, सत्ताधाऱ्यांवर वाढले हल्ले

Bangladesh Violence Updates : बांगलादेशामध्ये हिंसेचा आगडोंब उसळला आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना या राजीनामा देऊन भारतात पळाल्या आहेत. तर दंगेखोरांनी आता हिंदू आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ले सुरू केले आहेत. एका हॉटेलमधील 8 जणांना जिवंत जाळले आहे...

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसेचा आगडोंब, दंगेखोरांनी हॉटेलमध्ये 8 जणांना जीवंत जाळले, तर हिंदू, सत्ताधाऱ्यांवर वाढले हल्ले
बांगलादेशात हिंसेचा आगडोंब, 8 जणांना जीवंत जाळले
| Updated on: Aug 06, 2024 | 9:58 AM

बांगलादेशात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्या भारताच्या आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. बांगलादेशमध्ये आराजक माजले आहे. दंगेखोरांनी अल्पसंख्यांक हिंदू, शेख हसीना आणि त्यांचा पक्ष अवामी लीगचे समर्थक आणि त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या घरावर, पक्षाच्या कार्यालयावर हल्ले होत आहे. सोमवारी जेसोर येथे एका हॉटेलला दंगेखोरांनी आग लावली. त्यामध्ये 8 लोक जीवंत जळाले तर इतर 84 जण गंभीर जखमी झाले.

अवामी लीगच्या नेत्याचे हॉटेल

अवामी लीगचे नेते शाहीन चकलादार यांचे ते हॉटेल होते. चकलादार जेसोर जिल्ह्याचे अवामी लीगचे महासचिव आहे. पोलीस उपायुक्त अबरारूल इस्लाम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतात चयन आणि सेजन हुसैन या तरुणांचा मृत्यू झाला. जशोर सार्वजनिक रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. येथील कर्मचारी हारून या रशीद यांनी जवळपास 84 जणांवर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे ते म्हणाले.

दंगेखोरांचा तुरुंगावर हल्ला

बांगलादेशातील शेरपूर जिल्हा तुरुंगावर दंगेखोरांनी हल्ला केला. त्यावेळी 500 कैद्यांना तुरुंगातून पळ काढला. सोमवारी देशात संचारबंदी असताना हातात शस्त्रे, लाठ्या-काठ्या घेऊन मोठा जमाव रस्त्यावर उतरला. त्याने दमदमा-कालीगंज परिसरातील जिल्हा तुरुंगावर हल्ला चढवला. तिथे आग लावली आणि कैद्यांना बाहेर काढले.

बांग्लादेश हिंसेत 98 जणांचा बळी

4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही जमावावर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात 98 लोक मारल्या गेले. तर हजारो जखमी झाले. बांगलादेशाच्या इतिहासात ही आतापर्यंतची सर्वात मोठ्या हिंसक घटनेपैकी एक मानण्यात येत आहे. यापूर्वी 19 जुलै रोजी 67 लोक मारल्या गेले होते. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यासाठी हिंसक आंदोलन केले. बांगलादेशात आरक्षण विरोधात विद्यार्थी 2018 पासून आंदोलन करत आहे. पण यावेळी मोठी हिंसा झाली. हिसेंचे लोण संपूर्ण देशभरात पोहचले. या आंदोलनापुढे शेख हसीना सरकारला झुकावे लागले. एका विद्यार्थ्याने हे आंदोलन घडवून आणले. नाहिद इस्लाम असे त्याचे नाव आहे.