बोर्डाचा झटपट निर्णय, इयत्ता बारावीच्या परीक्षा अचानक रद्द; पुढचे टाइम टेबल काय? कारण आलं समोर

CBSE 12th Exam Cancel : इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसला असून अनेक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोर्डाचा झटपट निर्णय, इयत्ता बारावीच्या परीक्षा अचानक रद्द; पुढचे टाइम टेबल काय? कारण आलं समोर
CBSE Exam Cancel
Image Credit source: Google
| Updated on: Mar 15, 2026 | 3:02 PM

गेल्या 16 दिवसांपासून इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. जगातील सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगातील परिस्थिती झपाट्याने बदलल आहे. या युद्धाचा परिणाम आता सामान्य लोकांच्या जीवनावरही दिसू लागला आहे. दुसरीकडे मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम झाला असून मध्य पूर्वेतील अनेक शाळा आणि महाविद्यालये सध्या बंद आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील इयत्ता 12 वीच्या सर्व बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बारावीच्या परीक्षा अचानक रद्द

CBSE बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया या देशांमधील 16 मार्च ते 10 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या इयत्ता 12 वीच्या सर्व परीक्षा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. या भागातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण बोर्डाकडून देण्यात आले आहे. युद्धामुळे परीक्षा आयोजित करणे सुरक्षित नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं बोर्डाने सांगितले आहे.

यापूर्वी CBSE ने या देशांमधील इयत्ता 10 वीच्या सर्व बोर्ड परीक्षा देखील रद्द केल्या होत्या. तसेच 16 मार्चपर्यंत होणाऱ्या इयत्ता 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले होते. युद्धाची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून आता बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

निकाल कसा जाहीर होणार?

CBSE बोर्डाने परीक्षा रद्द करताना सांगितले की, 1 मार्च, 3 मार्च, 5 मार्च, 7 मार्च आणि 9 मार्च रोजी जारी केलेल्या सर्क्युलरद्वारे ज्या परीक्षांना स्थगित करण्यात आले होते, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा रद्द करण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर केला जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर CBSE ने म्हटले की, इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर केला जाईल, याबाबतची माहिती नंतर स्वतंत्रपणे दिली जाईल.

Follow Us