युद्धाने खेळ पालटला, ऑपरेशन सिंदूरवेळी पाकड्यांची साथ देणारा देश आता भारताशी मैत्री वाढवतोय, पाकिस्तानला झटका

ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने जाहीरपणे पाकिस्तानची साथ दिली होती. त्यांना ड्रोन्स पुरवले होते. पण अजून एक मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला. पण आता हा देश भारतासोबत मैत्री वाढवतोय. हे चांगले संकेत असून पाकिस्तानसाठी धक्का आहे.

युद्धाने खेळ पालटला, ऑपरेशन सिंदूरवेळी पाकड्यांची साथ देणारा देश आता भारताशी मैत्री वाढवतोय, पाकिस्तानला झटका
Middle East Tension
| Updated on: Apr 02, 2026 | 12:19 PM

मिडिल ईस्टमध्ये युद्ध सुरु आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरु झालेल्या युद्धाला 30 पेक्षा जास्त दिवस झालेत. कोणीही मागे हटायला तयार नाहीय. अमेरिका आणि इराणने आतापर्यंत अनेक दावे केलेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे युद्धात विजय मिळवल्याचा दावा करतात तर मुज्तबा खामेनेई अमेरिकेचं मोठं नुकसान केल्याचा दावा करतात. दोघांकडून काहीही दावे सुरु असले तरी युद्धात खरा फायदा भारताचा होत आहे. या युद्धा दरम्यानच भारताची विरोधी मानल्या जाणाऱ्या देशाबरोबर जवळकी वाढली आहे. हा देश म्हणजे अजरबैजान. पाकिस्तानसोबत अजरबैजानची चांगली मैत्री आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जाहीरपणे त्यांनी पाकिस्तानची साथ दिली. आता मिडिल ईस्ट संकटादरम्यान अजरबैजनाने भारताची चांगली मदत केली आहे.

इराणमध्ये अडकलेल्या 215 भारतीयांना अजरबैजानमार्गे बाहेर काढण्यात आलं. यासाठी भारताने अजरबैजानचे आभार मानले आहेत. बुधवारी बाकू येथे अजरबैजानचे परराष्ट्र मंत्री जेहुन बैरामोव आणि अजरबैजानमधील भारताचे नवनियुक्त राजदूत अभय कुमार यांची बैठक झाली. त्यावेळी भारताच्यावतीने अजरबैजानचे आभार मानण्यात आले.

भारताने मानले आभार

भारताचे राजदूत अभय कुमार यांनी इराणमधून अजरबैजानमध्ये दाखल झालेल्या भारतीय नागरिकांची व्यक्तिगत भेट घेतली. त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यांना दूतावासाकडून सर्व शक्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांना इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढावं लागलं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर कुमार यांनी सुद्धा अजरबैजान सरकारचे आभार मानले आहेत.

मध्य पूर्वेतील तणावाबद्दल चिंता

अजरबैजानने भारतीयांना सुरक्षित मार्ग देऊन मदत केली आहे. कठिण काळात दोन्ही देशात हे व्यावहारिक सहकार्य दिसून आलय. भारतीय राजदूत आणि अजरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत पश्चिम आशियाचा मुद्दा होता. अजरबैजानने मध्य पूर्वेतील तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने या देशाविरोधात काय पाऊल उचलेलं?

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अजरबैजान पाकिस्तान सोबत उभा राहिलेला. भारतीय नागरिकांनी अजरबैजानच्या या निर्णयाचा विरोध केलेला. सोशल मीडियावर बॉयकॉट अजरबैजान ही मोहिम छेडण्यात आलेली. अजरबैजानवर बहिष्कार टाकण्याच्या आव्हानानंतर ट्रॅव्हल बुकिंग पोर्टल्सच्या बुकिंगमध्ये मोठी घसरण झालेली. कॅन्सलेशनच प्रमाण वाढलेलं. भारतीय पर्यटकांनी अजरबैजानला जाण्याचा निर्णय रद्द केलेला. भारतातून अजरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 56 टक्के घसरण झालेली. अजरबैजान भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ बनत चाललं आहे. अलीकडच्या काही वर्षात अजरबैजानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

 

Follow Us