
इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 15 वा दिवस आहे. मात्र, युद्धाचे ढग काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. जसे जसे दिवस पुढे जात आहेत, तसे हे युद्ध अधिक घातक बनत चालले आहे. विशाखापट्टनम येथून युद्ध सराव करून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर मोठा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला. अमेरिकेच्या पाणबुडीने थेट मोठी धडक या युद्धनाैकेला दिली आणि ही युद्धनाैका बुडाली. ही घटना श्रीलंकेच्या समुद्रहद्दीत घडली. यानंतर श्रीलंकेकडून लगेचच बचावकार्य राबवत इराणी सैनिकांना सुरक्षित काढले. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. श्रीलंकेमध्ये या इराणी सैनिकांवर उपचार करण्यात आले. मात्र, युद्ध जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत या सैनिकांना श्रीलंकेत ठेवावे, याकरिता अमेरिका दबाव टाकत होती. अमेरिकेच्या विरोधात जाऊन श्रीलंकेने या सैनिकांना आणि इराणी सैनिकांच्या पार्थिवाला इराणमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. याकरिता भारत इराणच्या मदतीला धावून आला.
या युद्धनाैकेवर 180 इराणी सैनिक होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यु झाला तर काही सैनिक बेपत्ता झाले. विशाखापट्टनममध्ये ही इराणी युद्धनाैका युद्ध सरावाकरिता आली होती. फक्त इराणी नाैकाच नाही तर अनेक देश या सरावात सहभागी झाले होते. इराणच्या दिशेने श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत हल्ला करण्यात आला आणि इराणी युद्धनाैका बुडवण्यात आली.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या एअरलाईन्सच्या विमानाने काही तासात कोची विमानतळाहून इराणी सैनिकांना पाठवले जाईल. इराणकडून आपले 180 सैनिक परत नेण्यासाठी व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धनाैकेवर 183 एकूण इराणी सैनिक होते. विमानाच्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदाच आर्मेनिया येथे घेऊन गेले जाईल आणि त्यानंतर रस्त्याच्या मार्गे इराणला पोहोचवले जाईल.
भारत सध्याच्या काळात ऊर्जेच्या संकटात आहे. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा भारतात आजच्या घडीला आहे. यादरम्यान आपले जहाज सुरक्षित भारतात आणण्याकरिता भारत सतत इराणच्या संपर्कात आहे. इराणकडून भारताच्या जहाजांना होर्मुजमधून सुरक्षित मार्ग दिला जात आहे. यादरम्यानच आता इराणी सैनिकांचे विमान कोचीमधून निघणार आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देणे अधिकाऱ्यांनी टाळले आहे.