इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका ड्रायफ्रूट्सला, भारतात कोणते ड्रायफ्रूट्स महाग होणार? पाहा संपूर्ण यादी

इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला असून भारतात सुक्या मेव्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पिस्ता आणि अंजीराचे दर किलोमागे १०० रुपयांपर्यंत वधारले असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका ड्रायफ्रूट्सला, भारतात कोणते ड्रायफ्रूट्स महाग होणार? पाहा संपूर्ण यादी
iran dryfruits
| Updated on: Mar 03, 2026 | 1:40 PM

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहेत. याचा देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवरील व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या सुकामेवा आयातीवर झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. इराणमधील अनेक प्रमुख बंदरे बंद झाल्यामुळे आणि अफगाणिस्तानमधील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पिस्ता, अंजीर आणि मनुका यांसारख्या पदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

भारत ड्रायफ्रूटसाठी मोठ्या प्रमाणावर इराणवर अवलंबून आहे. विशेषतः बंदर अब्बास आणि चाबहार ही दोन इराणी बंदरे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सध्याच्या तणावामुळे ही बंदरे अंशतः बंद आहेत. त्यामुळे तिथून होणारी जहाजांची ये-जा थांबली आहे. यामुळे समुद्रात अनेक मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत. इराणमधून होणारा पुरवठा थांबला आहे. तर दुसरीकडे भारतीय व्यापाऱ्यांकडे साठवलेला माल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे किंमती सातत्याने वाढत आहेत.

कोणत्या सुक्या मेव्यावर किती परिणाम?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे विविध सुक्या मेव्याच्या किंमतीत प्रति किलो ४० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या पिस्त्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. साधारण १२०० ते १३०० रुपये प्रति किलो मिळणारा पिस्ता आता १५०० ते १६०० रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. इराण आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणाहून पिस्त्याची आयात होते. मात्र ही आयात घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे, अंजीर आणि मनुका यांच्या दरावरही मोठा परिणाम झाला आहे. भारताला होणारा बहुतांश अंजीराचा पुरवठा अफगाणिस्तानमधून होतो, मात्र तिथल्या अंतर्गत समस्या आणि आखाती संकटामुळे वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे अंजीराचे दर किलोमागे १०० रुपयांनी ने वाढले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत मनुका साठा संपत आला आहे. त्यामुळे मनुक्याचे दरही वाढले आहेत.

केवळ इराणच नव्हे, तर अफगाणिस्तानमधून येणाऱ्या सुक्या मेव्यालाही फटका बसला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमुळे अफगाणिस्तानचा रस्ते मार्ग आधीच कठीण झाला होता. आता आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग अधिकच असुरक्षित झाला आहे, ज्यामुळे अंजीराची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

सुक्या मेव्याच्या इतर प्रकारांच्या किमती वाढत असताना अक्रोडाचे दर मात्र सध्या स्थिर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या काश्मीरमधून घरगुती अक्रोडाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. स्थानिक उत्पादन पुरेसे असल्याने परकीय तणावाचा परिणाम अक्रोडावर किमान पुढील दोन महिने तरी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र येत्या काही महिन्यांत भारतात विविध सण, लग्नसोहळे आणि रमजानचा काळ येत आहे. अशा काळात सुक्या मेव्याची मागणी प्रचंड असते. या सुक्या मेव्याचा वापर मिठाई आणि इतर पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. सध्या घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम आता किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानातही दिसू लागला आहे.

Follow Us