राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या भारत विरोधी भूमिकेचा मालदीवच्या शाळांना मोठा फटका

| Updated on: Mar 20, 2024 | 2:59 PM

India-maldive row : मोहम्मद मुइज्जू यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे मालदीवला भविष्यात नक्कीच फटका बसणार आहे. एकीकडे सगळे देश भारतासोबत संबंध आणि व्यापार वाढवत असताना मालदीवच्या राष्ट्राध्य़क्षांनी मात्र स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.

राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या भारत विरोधी भूमिकेचा मालदीवच्या शाळांना मोठा फटका
Follow us on

India maldive row : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनला खूश करण्यासाठी भारताविरोधात भूमिका घेतल्या. पण आताच हीच गोष्ट त्यांच्या अंगलट आली आहे. कारण मुइज्जू यांच्या इंडिया आऊट मोहिमेचा फटका मालदीवच्या लोकांना बसत आहे. मुइज्जू यांनी भारतविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मालदीवमधील अनेक शिक्षकांनी देश सोडला आहे, त्यामुळे तेथील शाळा अडचणीत आल्या आहेत.

हा प्रश्न इतका गंभीर झाले की,  मालदीवच्या संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत, त्यानंतर मुइज्जू सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDM) खासदार मोहम्मद शाहिद यांनी संसदेत सरकारला याबाबत प्रश्न विचारला. मोहम्मद मुइज्जू यांच्या इंडिया आऊट मोहिमेमुळे अनेक शिक्षकांनी देश सोडला आहे, असे मालदीवियन मीडिया आउटलेट आधारधूने बातमी दिली आहे.

देशात शिक्षकांची कमतरता भासत असून मुलांच्या शिक्षणाला फटका बसत आहे. यावर सरकार काय करत आहे, असा सवाल एमडीएम खासदाराने केला. कारण मोहम्मद मुइज्जू यांनी इंडिया आऊटचा नारा दिल्यानंतर अनेक भारतीय शिक्षक मालदीव सोडून भारतात परतले आहेत.

मुइज्जू सरकारचे स्पष्टीकरण

या मुद्द्यावर संसदेत गोंधळ झाल्यानंतर मालदीव सरकारने मंगळवारी या विषयावर प्रतिक्रिया दिली. सरकारच्या स्थापनेनंतर अनेक भारतीय शिक्षकांनी मालदीव सोडले असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान मोहम्मद मुइज्जूचे इंडिया आऊट अभियान हे कारण असल्याचे त्यांनी नाकारले.

मालदीवचे शिक्षण मंत्री डॉ. इस्माईल शफीफू यांनी या प्रकरणावर अस्पष्ट उत्तर दिले आणि सांगितले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे कोणतीही संकटाची परिस्थिती नाही. मालदीवच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, जेव्हा एखादा शिक्षक निघून जातो तेव्हा काही आठवडे आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मालदीवमध्ये येणारे परदेशी शिक्षक लवकर परत जातात, असेही ते म्हणाले.

शफीफू म्हणाले, “गेल्या 30 वर्षांची आकडेवारी पाहिल्यास, तुम्हाला असे दिसून येईल की परदेशी शिक्षक कधी-कधी एका छोट्या बेटावर येतात आणि त्यांना महिनाभरानंतर जावेसे वाटू शकते. त्यामुळे मालदीवमधील शाळांमध्ये अशी परिस्थिती नाही.