Flash Flood : 50 कोटींचे सोने… चांदी आणि रोकड असलेले असंख्य बॉक्स, पुराच्या गाळात नेपाळचा खजिना; बँकांतून…
नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरात कृषी विकास बँकेची त्रिशुली शाखा पूर्णपणे बुडाली होती. पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी गाळातून ५० कोटींचे सोने, दीड कोटी रोकड, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढल्या. ८ तासांच्या बचावकार्यानंतर हा 'खजिना' वाचवण्यात यश आले.

नेपाळच्या भोटेकोशी नदीला महापूर आला आहे. या महापुरात मोठा हाहा:कार उडाला आहे. महापुराचे पाणी नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली परिसरातील कृषी विकास बँकेच्या शाखेतही घुसले होते. त्यामुळे संपूर्ण बँक पाण्यात बुडाली. पाच दिवसानंतर पाणी ओसरल्यावर बँकेच्या आत फसलेल्या कोट्यवधीच्या संपत्तीला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या बँकेतून पोलिसांनी 50 कोटीचं सोनं जप्त केलं आहे. बँकेत प्रचंड गाळ साचल्याने गाळात खोके अडकून पडले होते. त्यात हे सोनं होतं, अशी माहिती देण्यात आली आहे.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापूर आल्यानंतर कृषी विकास बँकेच्या त्रिशुली-ढुंगे शाखेला मोठा फटका बसला आहे. पणी, गाळ आणि मातीच्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे बँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचणं कठिण होतं. स्थानिक पोलिसांनी तब्बल 8 तास या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं. संपूर्ण गाळ उपसून काढला. त्यानंतर बँकेच्या आत ठेवलेलं किमती सोनं आणि रोख रक्कम पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभियानातून 50 कोटी नेपाळी मूल्याचं सोनं, सुमारे दीड कोटी नेपाळी रोकड, चांदी आणि अन्य किमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँकेतील महत्त्वाचे दस्ताऐवज सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहेत.
खजिना मिळवणं आव्हानच
भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रचंड पुरामुळे रस्ते आणि आसपासचे परिसर जलमग्न झाले होते. अनेक ठिकाणी पाण्याचे पाणी भरले आणि ढिगारा भरल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. या संकटाच्या काळात त्रिशूली येथील बँकेच्या शाखेत असलेली करोडोची संपत्ती सुरक्षितपणे बाहेर काढणं प्रशासनासाठी आव्हान होतं.
बँकेच्या शाखेत पाणी भरल्याने त्या ठिकाणी असलेले सोने, चांदी आणि रोकड तसेच महत्त्वाचे दस्ताऐवज सुरक्षित बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. बचाव पथकाने जीवमुठीत घेऊन बँकेच्या आत मोठं अभियान सुरू केलं. एक एक करून महत्त्वाचा खजिना बाहेर काढला.
तब्बल 8 तास पोलीस राबत होते. पोलिसांनी सर्व गाळ उपसला आणि देशाची महत्त्वाची संपत्ती बाहेर काढली. त्यामुळे बँक अधिकारी आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तथापि, भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळसमोर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिलं आहे. अशा संकटात मदत कार्य करण्यास यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याने आगामी काळात नेपाळला यावर काम करावं लागणार आहे.
781 लोकांचा मृत्यू
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी गेल्या पाच दिवसांपासून नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटावर कशा प्रकारची मात करण्यात आली. मदत कार्य कसं सुरू आहे, पुनर्वसनाची प्रक्रिया कशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय घडलं? याची माहिती शेअर केली आहे. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरात किती आर्थिक नुकसान झालं. भौतिक नुकसान किती झालं याची माहिती जमा केली जात आहे. तसेच अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम सुरू असल्याचं बालेन शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या नैसर्गिक प्रलयात आतापर्यंत 781 लोकांचा मृत्यू झाला आहे.