पाकिस्तान भारतावर अणू हल्ला करणार होता.. सुषमा स्वराज यांचा फोन.. अमेरिकेच्या माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा काय?

| Updated on: Jan 25, 2023 | 1:53 PM

पोम्पियो आणि त्यांच्या टीमने भारत तसेच पाकिस्तानला अणू हल्ल्याचा विचार करू नका, असे समजावून सांगितले, असं वर्णन पुस्तकात करण्यात आलंय.

पाकिस्तान भारतावर अणू हल्ला करणार होता.. सुषमा स्वराज यांचा फोन.. अमेरिकेच्या माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा काय?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः पाकिस्तानने (Pakistan) भारतावर (India) अणू हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. २०१९ मधील सर्जिकल स्ट्राइकनंतर (Surjical Strike) भारतावर मोठं संकट कोसळणार होतं. भारताचा बदला घेण्यासाठी पाकिस्ताननं हालचाली सुरु केल्या होत्या.. यासंदर्भात तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मला रात्रीतून फोन केला होता, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी केलाय. माइक पोम्पियो यांचे नवे पुस्तक मंगळवारी प्रकाशित झाले. ‘नेव्हर गिव्ह अॅन इंचः फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या नव्या पुस्तकात त्यांनी या प्रसंगाचं वर्णन केलंय.

माध्यमांतील वृत्तानुसार, माइक पोम्पियो यांनी पुस्तकात लिहिलंय, २७-२८ फेब्रुवारी २०१९ चा तो प्रसंग आहे. अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी ते हनोई येथे होते. त्या दिवशीची रात्र मी कधीही विसरू शकणार नाही, अशा भावना त्यांनी पुस्तकात मांडल्या आहेत.

त्यांनी लिहिलंय.. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान सीमावादातून दोन्ही देशांनी एकमेकांना धमक्या देणं सुरु केलं होतं. २०१९ च्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केली होती.

सर्जिकल स्ट्राइक भारतानं यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान बदला घेण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी मला फोनवर दिली, असा दावा माइक पोम्पियो यांनी पुस्तकात केला आहे. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट घेण्यात आली.

दरम्यान, आम्ही अणू हल्लाची तयारी करत आहोत, असा आरोप बाजवा यांनी फेटाळून लावला होता. पोम्पियो आणि त्यांच्या टीमने भारत तसेच पाकिस्तानला अणू हल्ल्याचा विचार करू नका, असे समजावून सांगितले, असं वर्णन पुस्तकात करण्यात आलंय.