Vaishnavi Hagwane Case : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; अखेर कोर्टात…
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यातील सहाही आरोपींवर आता आरोप निश्चित करण्यात आले असून, खटल्याची रितसर सुनावणी सुरू होणार आहे. हुंडाबळी, छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत. 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची रितसर सुनावणी सुरू होणार आहे. दोन्ही बाजूने होणारे युक्तिवाद आणि पुरावे पाहून कोर्ट त्यावर फैसला सुनावणार आहे. सत्र न्यायालयात हे आरोप निश्चित करण्यात आले असल्याने आता या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे, ही महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे. त्यासाठी राज्य सरकारनेही तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. आता ही प्रतिक्षा संपली.
वैष्णवीचा मृतदेह भुकूम येथील सासरी 16 मे रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद झाल्याने आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला होता. या प्रकारणाने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. मग तपासाची सूत्र वेगाने हलू लागली. पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली होती.
23 फेब्रुवारीपासून सुनावणी
या प्रकरणी आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ मारहाण, कट रचणे तसेच पुरावे लपवण्याचे आरोप आहेत. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे. 17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आता सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याची सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता. दोघांचाही प्रेम विवाह होता. शशांक याने वैष्णवीच्या घरच्यांकडून लग्नात गाडी घेतली होती. एवढं देऊनही लग्नानंतर सासरच्यांकडून वैष्णवीचा छळ केला जात होता. छळाला कंटाळून तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आलं होतं. त्यानंतर परत हा छळ सुरू राहिला. हुंड्यासाठी तिचा वारंवार छळ केला जात होता. त्यामुळे वैतागलेल्या वैष्णवीने आत्महत्या केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाणला नेपाळला पळून जात असताना अटक करण्यात आली होती. निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा आरोप आहे. वैष्णवीचं मुलही त्याच्याकडेच होतं, असाही आरोप आहे.
