
Pakistan Pulses Crisis : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच आर्थिक विवंचनेतून जातो. या देशाला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तर हा देश नेहमीच पैसे मागतो. या देशात कधी गव्हाचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळते. तर कधी पाण्याची टंचाई झालेली पाहायला मिळते. असे असतानाच आता या देशावर एक मोठे संकट आले आहे. या देशात डाळीचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दिवसेंदिवस डाळींच्या उत्पादनात घट होत आहे. बहुसंख्य डाळ परदेशातून आयात केली जाते. आकड्यांत सांगायचे झाल्यास पाकिस्तान प्रत्येक वर्षी साधारण 98 कोटी डॉलरची डाळ आयात करतो. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या रिपोर्टनुसार कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाकिस्तानातील या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात पाकिस्तानात डाळींचे उत्पादन न वाढल्यास मोठे संकट उभे राहू शकते. पंजाब पल्सेस इम्पर्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष आणि ग्रेन मार्केटचे चेअरमन राणा मुहम्मद तैयब यांनी सांगितल्यानुसार 1998 सालाच्या अगोदर पाकिस्तान जगातील प्रमुख डाळ निर्यात करणारा देश होता. नंतरच्या काळात परवेज मुशर्रफ यांच्या सरकारने डाळीवरील निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर डाळीच्या उत्पादनामुळे तोटा होऊ ळागला. परिणामी हळूहळू डाळींच्या उत्पादनात घट झाली.
पाकिस्तानात दरवर्षी 16.2 लाख टन डाळ लागते. यातील साधारण 10.7 लाख टन डाळ आयात केली जाते. म्हणजेच पाकिस्तानला साधारण 80 टक्के डाळ आयात करावी लागते. पाकिस्तानातील AARI चे पल्सेज सेक्सनचे मुख्य सहाय्यक खालीद हुसैन यांच्या मतानुसार डाळ ही मानवी पोषणासाठी तसेच मातीची पौष्टीकता कायम राहावी यासाठी फार गरजेची आहे. परंतु मर्यादीत नफा आणि निर्यातीवर बंदी असल्याने शेतकरी डाळीचे उत्पादनच घेत नाहीयेत. त्यामुळे आता परिस्थिती कठीण झाली आहे. दरम्यान, आता पाकिस्तान या संकटातून कसा मार्ग काढणार, भविष्यात पाकिस्तान डाळ निर्यातीवरील बंदी हटवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.