
Russia Supports India : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गाने कोंडी करत आहे. जागतिक पातळीवरही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असतानाच आता जगात महासत्ता असलेला रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. रशियाच्या या पाठिंब्यामुळे भारताचं एकाप्रकारे बळ वाढणार आहे.
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत महासत्ता असलेल्या रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आमचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला. या संवादात पुतीन यांनी आम्ही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याचं म्हणत पुतीन यांनी भारताला आश्वस्त केलं आहे.
भारत आणि रशिया यांच्यात फर जुनी मैत्री आहे. अनेक प्रसंगात हे दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत. रशियाकडून भारताला मोठी शस्त्रं मिळतात. युद्धजन्य परिस्थितीत रशियाने भारताला नेहमीच साथ दिली आहे. आता रशियाने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात लढाई देण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे व्लादीमीर पुतीन यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला आहे. या हल्ल्यात मृत पावलेल्यांप्रती पुतीन यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे, अशीही भूमिका पुतीन यांनी घेतलीय.
दरम्यान, 1971 सालच्या युद्धातही रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला होता. आता पुन्हा एकदा रशिया भारताच्या बाजूने आल्यामुळे पाकिस्तानला हा मोठा हादरा समजला जातोय. पाकिस्ताननं रशियाला मदतीसाठी आवाहन केलं होतं. पण रशियानं पाकिस्ताचं आवाहन झिडकारत भारताला पाठिंबा दिलाय. युद्धजन्य परिस्थितीत रशियाचा भारताला पाठिंबा असणे हे एकाप्रकारे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.