
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह जगातील विविध देशांना होणारा कच्च्या तेलाचा आणी नैसर्गिक वायुचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भारतात गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. कारण भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी तीन-चतुर्थांशपेक्षा अधिक भाग खाडी देशांकडून आयात करतो, तर गॅसच्या बाबतीत हा आकडा आणखी जास्त आहे. तसेच इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानेही संकट वाढले आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा भारताचा जुना मित्र रशिया मदतीला धावून आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असताना भारतासाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताचा दशकांपासूनचा जुना मित्र रशियाने पुन्हा एकदा मैत्री निभावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार खाडी देशांकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली असताना रशियाकडून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही काळात रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत 82 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा सध्या टिकून आहे. ही आनंदाची बाब आहे.
युद्धाच्या काळात मार्च महिन्यात खाडी देशांकडून भारताच्या तेल आयातीत घट नोंदली गेली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, इराक आणि यूएईकडून आयात अनुक्रमे सुमारे 69.2 टक्के आणि 72.8 टक्क्यांनी घटली आहे. तसेच सौदी अरेबिया आणि कुवैतकडून पुरवठ्यात 45 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ही घट युद्धामुळे झाले आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव तसेच अमेरिकेच्या सहभागामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या कारवायांनी खाडी क्षेत्रातील प्रमुख पुरवठा मार्गांवर परिणाम केला आहे.
खाडी देशांकडून पुरवठा खंडित होताच भारतीय रिफायनऱ्यांनी त्वरेने रशियन तेल खरेदी वाढवली. मार्चच्या पहिल्या 25 दिवसांत रशियाकडून भारताची तेल आयात 82.3 टक्क्यांनी वाढून दररोज 1.9 दशलक्ष बॅरल (bpd) झाली आहे. भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा फेब्रुवारीतील 20.1 टक्क्यांवरून मार्चमध्ये 45.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. संपूर्ण मार्च महिन्यात हा आकडा 2 दशलक्ष bpd च्या जवळ जाऊ शकतो, जो ऐतिहासिक उच्चांकाच्या आसपास आहे.