keir starmer : ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर सत्तेवर येणं भारताच्या खूप फायद्याच ठरणार, कारण…

keir starmer : ब्रिटनमध्ये सत्ताबदल झाला आहे. काल ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कीर स्टार्मर स्वबळावर लेबर पार्टीला 400 पार घेऊन गेले. भारतीय वंशाचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव केला. कीर स्टार्मर सत्तेवर येण भारताच्या खूप फायद्याच ठरणार आहे. कारण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांची भूमिका भारताला अनुकूल आहे.

keir starmer : ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर सत्तेवर येणं भारताच्या खूप फायद्याच ठरणार, कारण...
keir starmer
| Updated on: Jul 06, 2024 | 9:52 AM

यूकेमध्ये गुरुवारी निवडणूक झाली. शुक्रवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. बंपर विजयासह लेबर पार्टीने बरोबर 14 वर्षांनी सत्तेमध्ये पुनरागमन केलय. लेबर पार्टीच्या कीर स्टार्मर यांनी माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दणदणीत पराभव केला. कीर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीने 400 पारचा टप्पा ओलांडला. ते देशाचे पंतप्रधान बनले आहेत. ऋषि सुनक यांच्या पक्षाला अवघ्या 121 जागांवर समाधान मानाव लागलं. विजयानंतर स्टार्मर यांनी पुन्हा एकदा भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच काम सुरु केलय. 2019 साली लेबर पार्टीने काश्मीरबाबत जे वक्तव्य केलं, त्यानंतर कटुता निर्माण झाली होती. 2019 मध्ये लेबर पार्टीच नेतृत्व स्टार्मर यांच्या हाती नव्हतं. त्यावेळी जेरेमी कॉर्बिन पक्षाचे प्रमुख नेते होते.

2019 साली भारताने काश्मीरला विशेष अधिकार देणारा आर्टिकल 370 रद्द केला. त्यावेळी जेरेमी कॉर्बिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणीबाणीचा एक प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय शक्तींनी काश्मीरमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी भेटलं पाहिजे, असं कॉर्बिन यांनी प्रस्तावात म्हटलं होतं. लेबर पार्टीच्या नेत्याची ही भूमिका भारताला पटली नव्हती.

भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्दावर स्टार्मर यांची भूमिका काय?

आता स्टार्मर यांनी लेबर पार्टी आणि भारतामध्ये असलेला हा तणाव कमी करण्यासाठी पावल उचलली आहेत. ब्रिटनमधील भारतीयांसोबत बैठका आणि सार्वजनिक भाषणात स्टार्मर म्हणाले की, “काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे. भारत आणि पाकिस्तान हा दोघांचा विषय आहे. दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढावा”

लेबर फ्रेंड्स ऑफ इंडियाच्या बैठकीत काय म्हणालेले?

“भारतातील कुठलाही संवैधानिक मुद्दा हा भारतीय संसदेचा विषय येतो. काश्मीर भारत आणि पाकिस्तानसाठी द्विपक्षीय मुद्दा आहे. शांततामय मार्गाने यावर तोडगा काढला पाहिजे” असं लेबर फ्रेंड्स ऑफ इंडियाच्या बैठकीत कीर स्टार्मर म्हणाले होते.

हिंदु सणांमध्ये सहभाग

भारतासोबत लेबर पार्टीचे संबंध सुधारावेत यासाठी स्टार्मर प्रयत्न करत आहेत. स्टार्मर यांनी आपल्या घोषणापत्रात भारतासोबत व्यापार करारावर जोर दिला आहे. ब्रिटनमधील भारतीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी दिवाळी, होळी सारख्या हिंदु सणांमध्ये ते सहभागी झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us