Iran- US Ceasefire : अमेरिका-इराण युद्धविरामाने भारताचा सर्वात मोठा फायदा; काय काय घडणार? तज्ज्ञांनी दिली गुड न्यूज

अमेरिका आणि इराणमधील तात्पुरत्या युद्धविरामाने भारताला मोठा फायदा होणार आहे. विशेषतः इंधन टंचाई आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांपासून दिलासा मिळेल. तज्ज्ञांनुसार, हा युद्धविराम भारतासाठी सकारात्मक आहे, ज्यामुळे जागतिक बाजारातील स्थिरता वाढेल. चर्चेतून मार्ग निघाल्यास जगाला पूर्वस्थितीत येण्यास काही महिने लागतील, पण भारताची अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होईल.

Iran- US Ceasefire : अमेरिका-इराण युद्धविरामाने भारताचा सर्वात मोठा फायदा; काय काय घडणार? तज्ज्ञांनी दिली गुड न्यूज
अमेरिका-इराण युद्धविराम
Image Credit source: social media
| Updated on: Apr 08, 2026 | 2:38 PM

अमेरिका आणि इराणमधील युद्ध अखेर तूर्तास थांबलं आहे. दोन आठवड्यासाठी एकमेकांवर हल्ला न करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. या दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशात वाटाघाटी होणार आहेत. चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हे चर्चेचं केंद्रबिंदू असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबल्याने जगानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे युद्ध थांबल्याने जगाला त्याचा फायदा होणार आहेच, पण भारतालाही त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे, त्यातून भारत आता सावरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या सर्व घडामोडींवर निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला आहे. भारताला या युद्धविरामाचा खूप मोठा फायदा होणार आहे. लढाई सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा दर 80 डॉलर बॅरलवर होता, त्यानंतर तो 100 डॉलरच्या पुढे गेला. भारताच्या 45 ते 60 टक्के ऊर्जेचे स्त्रोत आखाती देशांतून येतात. त्यामुळे या युद्धाने उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.पण युद्धविराम झाल्याने भारतासाठी ही खूप मोठी सकारात्मक बातमी आहे. या युद्धात आपलं थेट काही देणंघेणं नव्हतं, मात्र त्याची झळ भारतालाही बसली होती, असं निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी सांगितलं.

अजून सहा महिने

अमेरिकेच्या अटी कायम राहणार आहेत. 12 दिवसांच्या युद्धामागेही तीच कारणे होती. अमेरिका अण्वस्त्राचा मुद्दा नेहमीच पुढे ठेवणार. सध्या हा एक ‘पॉज’ आहे. हा पॉज सकारात्मक दिशेने गेला आणि वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर परिस्थिती सुधारू शकते. आज युद्ध पूर्णपणे संपले तरी जगाला पूर्वस्थितीत यायला 6 ते 8 महिने लागू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

विजय इराणचाच

युद्धविराम हा इस्रायलसाठी हा धक्का आहे. इराणला कमकुवत केल्याशिवाय आमचं राहणं शक्य नाही, असे इस्रायलचे म्हणणे होते. इराणला धडा शिकवणे हे इस्रायलचे ध्येय होते. मात्र इस्रायलला हे पूर्णपणे साध्य झालेले नाही. या युद्धात सर्वांनी काही ना काही मिळवलं, मात्र पहिल्या टप्प्यात विजय इराणचाच दिसतो. अमेरिका थोडी भरकटलेली दिसली. इराणचे लोक चिवट आहेत, बाहेरून येणारे किती नुकसान करणार?इराणचे मोठे नुकसान झाले असले तरी पहिल्या फेरीत इराण आघाडीवर आहे, असा दावा बाम यांनी केला.

होर्मुझ उघडावेच लागेल

कच्च्या तेलाचा दर 112 बॅरल डॉलरपर्यंत गेला होता, आता दर काहीसे खाली आले आहेत. जगात तेल अत्यंत महत्त्वाचे आहे. तेल असेल तर सर्व काही शक्य होते, नसेल तर काहीच शक्य होत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे. ती इराणने उघडली नाही तर युद्ध पुन्हा भडकू शकते. ही सामुद्रधुनी इराणला उघडावीच लागेल, नाहीतर त्यांचंही मोठं नुकसान होईल, असंही त्यांनी सांगितलं.

चीन आणि रशिया सहभागी

चीन आणि रशिया या युद्धात अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत. हे दोन्ही देश इराणचे मित्र आहेत. या युद्धात रशिया आणि चीनकडून इराणला शस्त्रसाठ्याचा पुरवठा झाल्याचे दिसते. चार दिवसांपूर्वी 45 दिवसांच्या युद्धविरामाचा (ceasefire) प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असंही त्यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची तयारी सुरू होती. ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे आणि दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अधिक आक्रमक असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इराण हा भारताचा महत्त्वाचा मित्र राहिला आहे. तो गमावला असता तर आपल्या जहाजांची हालचालही अडचणीत आली असती. नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली होती आणि तिथल्या संसदेत संबोधन केले होते. या युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली तर चीन इराणवर प्रभाव टाकताना दिसतो. इस्रायलसंबंधीची परिस्थिती आता बदललेली आहे. दहशतवादाविरोधात ठाम भूमिका हे भारताचे धोरण स्पष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us