होय, पाकिस्तान दहशतवाद्यांचा आश्रयदाता…, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचा उघड पाठिंबा
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हिंसाचार अवैध आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. जागतिक शांततेसाठी हे धोकादायक आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. जागतिक पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा मिळत नाही. आता अमेरिकेनेही पाकिस्तानला उघडे पाडले आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना समर्थन देण्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हिंसाचार अवैध आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. जागतिक शांततेसाठी हे धोकादायक आहे. अमेरिकेकडून आलेले हे वक्तव्य आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मिळत असलेला पाठिंबा दाखवत आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ता टॅमी ब्रूस यांना प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठिंबा अन् प्रोत्साहन दिला जात असल्याचा भारताच्या आरोपाला तुमचा पाठिंबा आहे का? त्यावर टॅमी ब्रूस यांनी म्हटले, होय, हा नवीन मुद्दा नाही. अनेक दशकांपासून हा प्रश्न आहे. हे एक सत्य आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी लोकांचे जीवन अवघड बनवले आहे.
काश्मीरमध्ये जे झाले ते अस्वीकार्य आणि अवैध असल्याचे टॅमी ब्रूस यांनी सांगितले. ते म्हणाले, जगाने या पद्धतीचा हिंसाचार नाकारला आहे. आम्ही पहलगाम हल्ल्यातील पीडित परिवारांसोबत आमच्या संवेदना प्रकट करतो. ब्रूस पुढे म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांतील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. परंतु दोन्ही देशांनी संवादाला प्राधान्य दिले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. या चर्चेत अमेरिकेची भूमिका मध्यवर्ती राहिली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.
अमेरिकेकडून हे वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असताना आले आहे. त्यामुळे अमेरिका भारताच्या पाठिशी ठामपणे असल्याचे संकेत मिळत आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. भारताचा स्पष्ट आरोप असा आहे की पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाला आश्रय देतो आणि भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना चिथवणी देतो.