
पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असतो, पाकिस्तानी पंतप्रधान आणि नेते नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. मात्र या युद्धात जिहादच्या नावाखाली आपले लोक मारले गेले, तरीही पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानने या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले होते, जे आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. 1999 नंतर पाकिस्तानने अमेरिकन पाठिंबा मिळविण्यासाठी पुन्हा युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागली. ख्वाजा आसिफ यांनी या सर्व निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर खापर फोडताना म्हटले की, अमेरिकेने पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा आणि टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट केला आणि नंतर पाकिस्तानले वाऱ्यावर सोडून देण्यात आले.
ख्वाजा आसिफ यांनी पुढे बोलताना म्हटले की, मागील चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धांमध्ये प्यादे म्हणून ओळखू जाऊ लागला. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध उठाव झाला होता, जो अमेरिकेने घडवून आणला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती, त्यामुळे आपल्या लोकांनी त्या युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, ती एक मोठी चूक होती.
तालिबान आणि अफगाणित्सानवर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘तालिबानने रशियाविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला जिहाद म्हटले जाते. मात्र रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता म्हणून ते जिहाद नव्हते. या युद्धात पाकिस्तानच्या सहभागाला कोणतेही ठोस कारण नव्हते मात्र आम्ही तरीही लढलो. आम्ही 2001 मध्ये अमेरिकेसाठी तालिबानविरुद्ध आवाज उठवला. अमेरिका आता गेली आहे, मात्र आम्ही अजूनही त्याचे परिणाम भोगत आहोत, कारण हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही.’