GK: मृत्यूनंतर आधार निष्क्रिय कसं केलं जातं? असं करणं का आहे गरजेचं? समजून घ्या

तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं आधार बंद केलं जातं. पण हे कसं केलं जातं? का केलं जातं? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे मिळतील.

GK: मृत्यूनंतर आधार निष्क्रिय कसं केलं जातं? असं करणं का आहे गरजेचं? समजून घ्या
GK: मृत्यूनंतर आधार निष्क्रिय कसं केलं जातं? असं करणं का आहे गरजेचं? समजून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 07, 2026 | 9:52 PM

Aadhaar Deactivation: आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्ताऐवज म्हणून गणलं जातं. त्याच्या शिवाय सरकारी योजना आणि आर्थिक व्यवहार करणं सध्याच्या काळात कठीण आहे. भारतीयांसाठी हे एक ओळखपत्र असून विविध योजनांचा लाभ घेता येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? मृत्यूनंतर आधार कार्डचं काय होतं? तसंच सक्रिय राहतं की बंद केलं जातं? त्याचं उत्तर असं की, आधार मृत्यूनंतर निष्क्रिय केलं जातं. ओळख चोरी आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी मृत व्यक्तीचं आधार निष्क्रिय केलं जातं. कारण आधार सक्रिय राहिलं तर मृत व्यक्तीच्या नावाने बरेच गैरप्रकार केले जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. सिम कार्ड खरेदी, पेन्शन, अनुदान आणि रेशन या सारख्या योजनांचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुंटुंबियांसाठी असे प्रकार भविष्यात त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे आधार निष्क्रिय करणं आवश्यक ठरतं. आधार निष्क्रिय करण्यासाठी प्रक्रिया काय? असा पुढचा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर पुढे सविस्तर समजून घेऊयात.

मृत व्यक्तीचं आधार निष्क्रिय करणं का आवश्यक आहे?

आधार निष्क्रिय केल्याने संभाव्य गैरप्रकार टाळता येतात. कारण मृत्यूनंतर आधार क्रमांक कायमस्वरूपी निष्क्रिय केलं जातं. आधार क्रमांक कायमस्वरूपी निष्क्रिय म्हणून चिन्हांकित केले जाते. इतकंच काय तर बायोमेट्रिक फसवणूक टाळण्यासाठी मृत व्यक्तीची बोटांचे ठसे, बुबुळांचे स्कॅन आणि चेहऱ्याचा डेटा यासह बायोमेट्रिक माहिती कायमस्वरूपी लॉक केली जाते. प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक एकच असतो आणि तो कधीही दुसऱ्या व्यक्तीला दिला जाऊ शकत नाही. पण, व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिचे आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार सुरक्षित राहावेत आणि भविष्यात सरकार किंवा कुटुंबाला जुना रेकॉर्ड तपासता यावा, यासाठी युआयडीएआय हा डेटा सुरक्षित ठेवते, तो हटवत नाही. पण आधार निष्क्रिय केलं जातं.

युआयडीएआयला आधारधारक मृत असल्याचं कसं कळतं?

युआयडीएआयने अनेक सरकारी संस्थांसोबत एक एकात्मिक पडताळणी प्रणाली तयार केली आहे. देशात जन्म मृत्यूची नोंदणी प्रणाली सांभाळणाऱ्या रजिस्टार जनरलकडून मृ्त्यूच्या नोंदी पटकन मिळतात. इतकंच काय तर बँक आणि विमा कंपन्यांसोबत समन्वय असतो. त्यामुळे नोंदी सहज उपलब्ध होतात. दुसरीकडे, कुटुंबिय सुद्धा ‘मायआधार’ पोर्टलवर मृत्यूची माहिती नोंदवू शकतात. अर्जदाराला मृत व्यक्तीचा 12 अंकी आधार क्रमांक, मृत्यू नोंदणीची माहिती भरावी लागते. तसेच मृत्यू दाखल्याची कॉपी स्कॅन करून अपलोड करावी लागते. त्यानंतर कुटुंबातील सदस्याला त्याचा आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर करून ओटीपी प्रमाणीकरणाद्वारे सत्यापित करावं लागतं. तसेच मृत व्यक्तीसोबतचे नाते नोंदवावं लागतं.

अर्ज सादर केल्यानंतर युआयडीएआय़ एक तपास क्रमांक जाहीर करते. त्या माहितीच्या आधारे ज्या राज्याकडून मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं आहे त्या राज्याच्या नागरी नोंदणी प्रणालीद्वारी पडताळणी केली जाते. पडताळणी पूर्ण झाली आणि सर्व तपशील जुळून आले तर आधार क्रमांक कायमस्वरूपी निष्क्रिय केला जातो.

जिवंत व्यक्तीचे आधार चुकून निष्क्रिया झाले तर…

युआयडीएआयकडे मृत व्यक्तीच्या पडताळणीसाठी अनेक यंत्रणा असल्या तरी कधी कधी चुका होण्याची शक्यताही आहे. जर एखाद्या हयात असलेल्या व्यक्तीचा आधार मृत म्हणून नोंदवलं असेल तर घाबरण्याचं कारण नाही. आपल्या ओळखपत्रासह जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊ पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. तसेच नव्याने बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर आधार क्रमांक पुन्हा सक्रिय होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us