वर्धा जिल्ह्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटींची कर्जमाफी

| Updated on: Aug 26, 2020 | 2:59 PM

कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली आहे (Farmer loan waiver Wardha).

वर्धा जिल्ह्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटींची कर्जमाफी
Follow us on

वर्धा : कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली आहे (Farmer loan waiver Wardha). वर्ध्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफी देताच जिल्ह्यातील 38 हजार 396 शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज घेतले. या शेतकऱ्यांना आतापर्यंत 369 कोटी 96 लाख रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 51.87 टक्के पिककर्जाचे वाटप करण्यात आलं आहे (Farmer loan waiver Wardha).

प्रारंभी काहीशी अडचणीची दिसत असलेली राज्य सरकारची कर्जमाफी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहे. सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्या काळापासून आतापर्यंत वर्ध्यात शेतकऱ्यांच्या पाच याद्या प्राप्त झाल्या आहेत. यात 53 हजार 514 शेतकरी पात्र ठरले. त्यापैकी 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.

शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त होताच त्यांना नव्या कार्जाचा लाभ झाला. मध्यंतरी सातबारावर कर्जाचा उल्लेख असल्याने काही शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार घडला. यावर शासनाने हमी दिल्यावरही काही बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी फिरवत असल्याचे पुढे आले होते. या सर्व स्थितीवर मात करत जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे.

यंदा पिककर्जाचे उद्दिष्ट 1029 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. यापैकी 47 हजार 552 शेतकऱ्यांना 479 कोटी 78 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटप करण्यात आलेल्या 47 हजार 552 शेतकाऱ्यांपैकी यंदा कर्जमाफ झालेल्या 38 हजार 396 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्ज मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळावे याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहे.

राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होताना दिसतोय. मागील अनेक वर्षांपासून नवीन पीक कर्जापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग या योजनेमुळे सुकर झाला आहे. पण असे असलं तरी इतरही शेतकऱ्यांना योजनेचा तातडीनं लाभ देण्याची गरज आहे. कारण एकीकडे कोरोनाशी लढताना शेतमालाचे भाव पडल्याने झालेलं आर्थिक नुकसान अजूनही भरून निघालेलं नाहीये.

कर्जमाफीच्या पाच यादीत 320 मृत शेतकऱ्यांची नाव

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या पाच याद्या जिल्ह्यात जाहीर करण्यात आल्या. या पाच यादीत एकूण 53 हजार 514 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 48 हजार 704 शेतकऱ्यांच्या खात्यात 433 कोटी 7 लाख रुपये वळते सुद्धा करण्यात आले आहे. तसेच जाहीर झालेल्या पाच याद्यांमध्ये 320 शेतकरी मृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वारसांना या माफीचा लाभ मिळणार आहे. यात केवळ त्यांना बँकेच्या खात्यात बदल करायचे आहे. त्यामुळे त्यांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे.

संबंधित बातम्या :

वर्ध्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवी यादी जाहीर, आतापर्यंत 44 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 392 कोटी जमा

पारनेर नगरसेवक ते कर्जमाफी, चंद्रकांत पाटलांचे ‘रोखठोक’साठी चार प्रस्ताव