
औरंगाबादः देशात लसीकरणात (Corona Vaccination) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunul Chavan) यांच्याशी बातचित केली होती. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या औरंगाबादेत लसीकरण मागे पडणे ही खूप गंभीर बाब असल्याचं त्यांनी बैठकीत म्हटलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचंड वेगाने सूत्रे हालवत संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरातील महापालिका (Aurangabad Municipal corporation) क्षेत्रांमध्ये लसीकरण सक्तीसाठी नियम बनवले. प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आल्यामुळे ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील चार दिवसातच औरंगाबादमध्ये 1 लाख जणांना लस देण्यात आली.
गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तब्बल एक लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरीही उद्दिष्टाच्या तुलनेत अजून पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 24 टक्केच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लस न घेणाऱ्यांवर अनेक ठिकाणी निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यासाठीचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. महापालिकेने ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत 52,149 घरांचे सर्वेक्षण केले. तर अनेकांच्या घरी फोन करून लसीकरणाबाबत विचारपूस करण्यात आली. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी खुलताबाद तालुक्यातील गल्लोबोरगावात जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. एका शेतकऱ्याकडे मुक्कामही केला.
औरंगाबाद शहरातील 10 लाख 55 हजार 654 आणि ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 एवढ्या म्हणजेच एकूण 32 लाख 24 हजार 677 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 18 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच अजूनही जिल्ह्यातील 13 लाख 32 हजार 31 लोकांनी लस घेतलेली नाही. जिल्ह्यात फक्त 24.86 टक्के लोकांचेच दोन्ही डोस झाले आहेत. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
इतर बातम्या-