वर्धा : क्लास वन अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून सीमोल्लंघन, प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

| Updated on: Apr 27, 2020 | 11:00 PM

वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. प्रशासनाने हाच कारवाईचा बडगा आता खुद्द अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर उगारला आहे (Action against class one officers).

वर्धा : क्लास वन अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून सीमोल्लंघन, प्रशासनाकडून कारवाईचा बडगा
Follow us on

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व अधिकारी (Action against class one officers) आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीसुद्धा सरकारच्या आदेशाला धुडकावत वर्ध्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून दररोज अपडाऊन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा 69 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आज वर्धा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. यामध्ये महसूल, आरोग्य आणी बँकिंग क्षेत्रातील क्लास वन अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे (Action against class one officers).

वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. प्रशासनाने हाच कारवाईचा बडगा आता खुद्द अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर उगारला आहे. या कारवाईत तब्बल 69 अधिकारी आणि कर्मचारी अडकले आहेत. काहींवर नागरी कायद्यान्वे, तर काहींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. काहींविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे.

वर्धा जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. वर्धा जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सीमोल्लंघन करुन दररोज ये-जा करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याआधी तंबी दिली गेली होती. वेळोवेळी सूचना देऊनही क्लास वन अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यापर्यंत कुणी सूचना पाळताना दिसून येत नव्हते. त्यामुळे याविरोधात अखेर आज कारवाई करण्यात आली.

नागपूर सीमेवर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास केलेल्या तपासणीत चक्क जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा निबंधक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक असे 69 अधिकारी आणि कर्मचारी सीमेवर रोखण्यात आले. त्यांची तपासणीदेखील करण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय : बांग्लादेशी तरुण उपचारासाठी पोहत पोहत आसाममध्ये

महाराष्ट्रात 522 नवे कोरोना रुग्ण, एकूण आकडा 8 हजार 590 वर