बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नका, त्यांनी विश्वासघात…; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं ठाम मत

Radhakrishn Vikhe Patil on Bacchu Kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याबाबतचं विधान केलं आहे. तसंच विधानसभेच्या निवडणुकीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नका, त्यांनी विश्वासघात...; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं ठाम मत
बच्चू कडू, नेते प्रहार
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 28, 2024 | 1:25 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यापैकीच एक म्हणजे प्रहारचे नेते बच्चू कडू… अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बच्चू कडू घेणार राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळावा घेणार आहेत. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्याआधीच बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.

“बच्चू कडूंना महायुतीत घेऊ नका”

राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला आहे. बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिलं. धोरण मान्य केली. दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चू कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे, विखे पाटील म्हणालेत. मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा पेच कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी जरी मोदी- शाह यांचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं असलं. तरी महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणून. ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमची पहिली पसंती हि देवेंद्र फडणविस यांनाच आहे, असं विखेंनी म्हटलं आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या खात्याची अपेक्षा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मंत्रिपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्रजींनांच आहे. त्यामुळे वेगळं मागण्याचं कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे. निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असं विखे पाटील म्हणाले.