चंद्रपूरमधील दारुबंदीचा पुनर्विचार केला नाही, अजित पवारांचा डॉ. अभय बंगांकडे खुलासा

| Updated on: Jan 25, 2020 | 5:18 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपण चंद्रपूरमधील दारुबंदीवर कोणत्याही प्रकारे पुनर्विचार केला नाही, असं स्पष्ट केलं आहे (Ajit Pawar on Chandrapur Alcohol Ban).

चंद्रपूरमधील दारुबंदीचा पुनर्विचार केला नाही, अजित पवारांचा डॉ. अभय बंगांकडे खुलासा
Follow us on

गडचिरोली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपण चंद्रपूरमधील दारुबंदीवर कोणत्याही प्रकारे पुनर्विचार केला नाही, असं स्पष्ट केलं आहे (Ajit Pawar on Chandrapur Alcohol Ban). त्यांनी स्वतः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांना फोन करुन याबाबत खुलासा केला. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेची डॉ. बंग यांनी माध्यमांना माहिती दिली (Ajit Pawar on Chandrapur Alcohol Ban).

अजित पवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा आदेश दिला नाही. मी पूर्ण राज्यातील उत्पन्नाचा आढावा घेतला. त्यात उत्पादन शुल्क विभागाचाही आढावा घेतला. यात अधिकार्‍यांनी मला केवळ माहिती दिली. मी चंद्रपूरच्या दारुबंदीविषयी कोणताच आदेश दिला नाही.”

“दारुबंदी हटवण्याची बातमी खोडसाळपणा”

मी चंद्रपूरमधील दारुबंदीविषयी कोणताच आदेश दिला नाही. कोणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने चूकीची बातमी माध्यमांना दिली. वस्तुत: असा निर्णय घेण्याचा अधिकार माझा किंवा इतर कोणत्याही मंत्र्याचा नाही. यावर केवळ कॅबिनेटच तसा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही अजित पवार यांनी दिल्याची माहिती डॉ. अभय बंग यांनी दिली.

प्रकरण काय आहे?

मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारकडून कर उत्पन्न वाढवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याबाबत हालचाल सुरु असल्याची चर्चा सुरु होती. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील दारुबंदी हटवण्याच्या बाजूने मत प्रदर्शन केलं आणि डॉ. बंग यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली. सरकारच्या या निर्णयाच्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अभय बंग यांनी सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या मार्गांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला होता. तसेच सरकारनं उत्पन्न वाढीसाठी पापाच्या कराचा आधार घेऊन हजारो कुटुंबं उद्ध्वस्त करु नयेत, असंही आवाहन केलं होतं. यावेळी डॉ. अभय बंग यांनी दारुबंदी हटवण्यासाठी केला जाणारा सर्व युक्तीवादही खोडून काढला होता.


डॉ. अभय बंग म्हणाले होते, “चंद्रपूरमध्ये 2015 मध्ये लागू झालेली दारूबंदी हटवण्याची चर्चा सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. मला ही बातमी अविश्वसनीय वाटते. कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी डॉ. राणी बंग अजित पवार यांना भेटल्या तेव्हा त्यांनी स्वतः चंद्रपूरच्या दारूबंदीला पाठिंबा दिला होता. या सरकारने पूर्वीच्या शासनाचे घेतलेले चांगले निर्णय रद्द न करता उलट ती अपूर्ण कामं पूर्ण करावीत. एकीकडे कर्जमाफी, शिवभोजन अशी चांगली कामे केली जात आहेत. मात्र, दारुबंदी हटवून त्याच लोकांना दारू पाजली गेली, तर सरकारची चांगली कामही निरर्थक ठरतील.”

“अजित पवार उत्तम प्रशासक, त्यांनी दारुबंदीची चांगली अंमलबजावणी करावी”

डॉ. अभय बंग म्हणाले, “दारुबंदीनंतर चंद्रपूरमध्ये 90 कोटी रुपयांची दारू कमी झाली आहे. उरलेली दारू कशी कमी करायची हा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा प्रशासकीय प्रश्न आहे. तिथे पूर्वीचे शासन कमी पडले. अजित पवार उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपली क्षमता दारूबंदीच्या चांगल्या अंमलबजावणी वापरावी.”

संबंधित बातम्या:

सरकारनं उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावं, पापाचा कर नको : डॉ. अभय बंग

BLOG: चंद्रपूरची दारूबंदी : सरकारला महसूल महत्वाचा की नागरिकांचे आरोग्य?

‘त्या’ मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन दारु पाजू : तृप्ती देसाई

चंद्रपुरात पुन्हा ‘उभी बाटली’, दारुबंदी हटवण्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली

BLOG: दारुबंदीसारखं भ्रष्टाचारविरोधी कायद्यानं भ्रष्टाचार संपला नाही म्हणून कायदा रद्द करायचा का?

मोतीबाईंचे अश्रू पाहून जयंत पाटील भावूक, यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी सकारात्मक