अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाचं शरमेने मान खाली घालवणारं कृत्य, दुसऱ्यांदा वीजचोरी, गुन्हा दाखल

| Updated on: Sep 27, 2021 | 11:40 PM

महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये रिमोटच्या साहाय्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे महावितरणाने याआधी देखील या हॉटेलवर कारवाई केली होती.

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाचं शरमेने मान खाली घालवणारं कृत्य, दुसऱ्यांदा वीजचोरी, गुन्हा दाखल
संपूर्ण लेबनॉन अंधारात बुडाले, अनेक दिवस देशात येणार नाही वीज
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये रिमोटच्या साहाय्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे महावितरणाने याआधी देखील वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई केली होती. त्यावेळी महावितरणाने चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल आणि 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हॉटेलची चोरी कशी पकडली गेली?

संबंधित हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता आणि हॉटेलचा मालक यांच्याविरोधात वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे.

महावितरणाची वीज चोरांविरोधातील कारवाई सुरुच राहणार

नोव्हेंबर 2017 मध्ये हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते. महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घरगुती वीज ग्राहकांचे मीटर ‘स्मार्ट’ होणार

दरम्यान, राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मीटर संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला होता. घरगुती वीज ग्राहकांच्या रिडिंगबाबतच्या तक्रारींवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ऊर्जा विभागाने जुलै महिन्यात मोठा निर्णय घेतला होता. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते.

सिम कार्डप्रमाणे स्मार्ट मीटरचा वापर

मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाईल. मीटरमध्ये छेडखानी करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने विवेकी वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पध्दतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पध्दतीने करत येणे शक्य आहे. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच एखाद्या दूरस्थ पद्धतीने बसून मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेतला जाऊ शकतो.

हेही वाचा :

कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय सुरुय? अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची आणखी एक घटना, भाजप कार्यकर्त्याला बेड्या

एक्स-गर्लफ्रेंडचे हात-पाय बांधले, जिवंत सुटकेसमध्ये टाकलं, नंतर जंगलात फेकलं, प्रियकर इतका निर्घृणपणे का वागला?