जलसंधारणातील 650 कोटींची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, मुरकुटेंची मंत्री गडाखांकडे मागणी

| Updated on: Jul 08, 2021 | 5:16 PM

शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये पाण्यावरुन राजकारण तापलंय.

जलसंधारणातील 650 कोटींची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, मुरकुटेंची मंत्री गडाखांकडे मागणी
Follow us on

अहमदनगर : शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये पाण्यावरुन राजकारण तापलंय. भाजप नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जलसंधारणात 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी मुरकुटे यांनी पेरण्या झाल्यानंतर पाऊस थांबल्यानं पिकं जळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुळा धरणातून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणीही केली. मुरकुटे यांनी आज (8 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन याबाबत निवेदन दिलंय (Balasaheb Murkute criticize Shankarrao Gadakh over Mula Dam water for farm).

पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची उभी पिकं जळताय, मंत्री गडाख झोपलेत का?

बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, “जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडून आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेले उभी पिके जळून चालली आहेत. येत्या 8 दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील.”

“रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करणारा शेतकऱ्यांचा पाणीदार नेता आता कुठे गेला?”

“जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडले होते. तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता?” असा सवाल मुरकुटे यांनी केला.

“बांधावर यावं लागेल, मुंबईत एसीत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न समजणार नाही”

बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, “मंत्री गडाख यांनी नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. ते आपल्या मतदारसंघात दिसत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात. त्यासाठी मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो. परंतु मंत्रिमहोदय मुंबई येथे एसीमध्ये बसून राहतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे,” असा आरोप बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.

येत्या 8 दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे. अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. त्यांनी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना दिलं. यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटने आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

माझ्या घरावर धाड टाकत झडती घेऊन त्रास दिला, आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप

‘भोळ्या शंकरा’, ‘पाणीदार आमदार’; जाणून घ्या, कोण आहेत शंकरराव गडाख?

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या

व्हिडीओ पाहा :

Balasaheb Murkute criticize Shankarrao Gadakh over Mula Dam water for farm