अकराव्या वर्षी अपहरण, सातवेळा विक्री, दहा वर्षांनी अखेर नराधमांच्या हातून सुटका

| Updated on: Jan 08, 2020 | 12:14 PM

2010 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे चंद्रपुरातून अपहरण करून तिची हरयाणात विक्री करण्यात आली होती. आता तब्बल दहा वर्षांनी तिची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे

अकराव्या वर्षी अपहरण, सातवेळा विक्री, दहा वर्षांनी अखेर नराधमांच्या हातून सुटका
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यात मानवी तस्करीचं एक खळबळजनक प्रकरण उजेडात आलं आहे (Human Trafficking Racket). 2010 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे चंद्रपुरातून अपहरण करून तिची हरयाणात विक्री करण्यात आली होती. आता तब्बल दहा वर्षांनी तिची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे (Chandrapur Police). या दहा वर्षांदरम्यान त्या मुलीची तब्बल सातवेळा विक्री करण्यात आली, सतत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. तर हरयाणा पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं आहे (Human Trafficking Racket).

चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात 2010 मध्ये परिसरातील मंदिराजवळ खेळत असलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. अपहरकर्त्यांनी प्रसादात गुंगीचं औषध देऊन तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिला हरयाणा राज्यातील पानीपत येथे नेण्यात आलं. तिथे तिची पहिल्यांदा विक्री करण्यात आली. खरेदी केलेल्या व्यक्तीने तिला शेतातील घरात डांबून ठेवले. त्या व्यक्तीच्या मुलांनी वारंवार तिच्यावर अत्याचार केले. अजाणत्या वयात या मुलीचा तब्बल सातवेळा सौदा झाला. त्यातून तिला दोन मुलंही झाली.

विक्रीच्या निमित्ताने पीडित मुलीला हरयाणातील विविध शहरात ठेवण्यात आले. त्यानंतर सातव्यांदा हरयाणातीलच फतेहाबाद इथे तिचा सौदा झाला. तिला धर्मवीर नावाच्या व्यक्तीने खरेदी केलं. त्याने तिला शहरातील एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले. मात्र, या खोलीच्या घरमालकाला मुलीच्या वर्तनाचा संशय आला. त्यांनी तिची विचारपूस केली आणि ही सारी हकिगत समोर आली. तिच्यासोबत दहा वर्षांपासून घडलेल्या गोष्टी ऐकून घरमालकाला धक्का बसला. त्यांनी पीडित मुलीची सुटका करण्याचं ठरवलं. घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या मुलीची सुटका केली.

त्यानंतर हरयाणा पोलिसांनी यासंबंधीचा मूळ गुन्हा शोधून काढला. तर चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात अशा प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचं त्यांना कळालं. त्यानंतर रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद गाठून या मुलीला चंद्रपुरात परत आणले. रामनगर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली असून हे संपूर्ण रॅकेट खूप मोठं असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर हरयाणा पोलिसांनीही या प्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.

मानवी तस्करीचे हे एक मोठे रॅकेट असून सध्या पोलीस त्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अशा प्रकारे गेल्या काही वर्षात अचानक बेपत्ता झालेल्या मुलींच्या नातेवाईकांना भेटून तपासाला सुरुवात केली आहे. चंद्रपुरात अशा पद्धतीने अपहरण करुन छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या चार राज्यात मुलींची विक्री झाल्याची अनेक प्रकरणं याआधीही घडले आहेत. मात्र, हे गुन्हे एखाद्या मोठ्या गुन्ह्याच्या साखळ्या असल्याचे लक्षात घेत तपास झाला नाही. प्रकरणांचा एकत्रित तपास झाला नाही. ताज्या घटनेत पीडित मुलगी स्वतः आपबिती कथन करत असल्याने पोलिसांना याबाबतीत अनेक धागेदोरे गवसले आहेत. त्यामुळे मानवी तस्करीच्या या रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न सध्या चंद्रपूर पोलीस करत आहेत.

Chandrapur Human Trafficking Racket