मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाई; मुख्यमंत्र्यांचा साखर कारखान्यांना इशारा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “साखर उद्योग ज्या-ज्या वेळी अडचणीत आला, त्या-त्या वेळी राज्य सरकार मदतीला धावून आले. भविष्यातही सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून येईल. मात्र, साखर कारखान्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे, तसे सहकार्य केलेले नाही. आम्ही नवीन योजना आणतो आहे, पण कारखाने आम्हाला सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. यापुढच्या काळात साखर कारखान्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्याने 2 वर्षात मोठी तूट निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी आणि सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू नये.”
यावेळी फडणवीसांनी साखर उद्योगाचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वही अधोरेखित केले. तसेच या उद्योगांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे कबूल केले. ते म्हणाले, “साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. साखर उद्योगात मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य सहकारी बँका देखील या उद्योगाच्या पाठीशी आहेत. मात्र, कारखाने अडचणीत आले, तर बँकाही अडचणीत येतात. मागील अनेक दिवसांपासून या उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. साखरेच्या जागतिक दरामुळे देशातील मार्केट थांबलंय.”