मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार

| Updated on: Oct 29, 2020 | 11:52 PM

कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरु करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार
Follow us on

मुंबई : कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरु करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसंदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन ही मर्यादा वाढवून घेण्याचा शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (CM Uddhav Thackeray appeal to start onion auction)

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून आपण त्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु. शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तसेच लासलगाव मर्चंटस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने 23 ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 03 अन्वये आदेश काढून कांद्याचा जीवनावश्यक सूचित समावेश केला आहे. तसेच या अंतर्गत घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टनांपर्यंत तर किरकोळ व्यापारी वर्गाला फक्त 2 टनांपर्यंत कांदा साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

या पार्श्वभूमीवर आज कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संघटनाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व आपापल्या अडचणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी संघटनानी उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून कांदा खरेदी सुरु करण्याचे आश्वासन दिले.

(CM Uddhav Thackeray appeal to start onion auction)

संबंधित बातम्या

‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सकारात्मक चर्चा, उद्धव ठाकरे उद्या केंद्र सरकारशी बोलणार’

व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी

व्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार