घराबाहेर पडण्यावर बंदी, राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 23, 2020 | 5:39 PM

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात (CM Uddhav Thackeray On Corona Virus)  येत आहे.

घराबाहेर पडण्यावर बंदी, राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Follow us on

मुंबई :कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात (CM Uddhav Thackeray On Corona Virus)  येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

“रविवारी (22 मार्च) राज्यात कलम 144 लागू केलं होतं. त्यानंतर आता राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“त्याशिवाय रेल्वे, बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे. खासगी वाहनांसाठी जर अत्यावश्यक असेल तरच सुरु राहतील. यात रिक्षा टॅक्सीतील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. चार चाकी वाहनांमध्ये चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी दिली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

“राज्यातील विमानतळेही बंद कऱण्यासाठी (CM Uddhav Thackeray On Corona Virus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तेही लवकरात लवकर बंद होतील,” असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

“जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“मी विनंती करुनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हे निर्णय घ्यावे लागत आहे. काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व मंदिरंं, प्रार्थनास्थळ बंद ठेवावी. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील,” असेही ते म्हणाले.

“वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करु,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“सध्या कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे. टर्निंग पॉईंटवर आलो आहे. हीच ती वेळ आहे आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे, तसंच ते महाराष्ट्रात घालेल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काम करतंय. काल जनतेने निश्चयाने घरात राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी पाच वाजता टाळ्या थाळ्या, घंटा वाजवल्या. पण टाळ्या वाजवणे म्हणजे व्हायरस पळवणे नाही. तर वैद्यकीय सेवा देणारे आणि पोलिसांना अभिवादन करण्याचा तो एक भाग आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“मी सर्व माध्यमांनाही धन्यवाद देतो. कारण कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जे घरी विलगीकरणात आहेत त्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाऊले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत,” असेही उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Corona Virus) म्हणाले.

जमावबंदी आणि संचारबंदीमध्ये फरक काय?

  • जमावबंदीत नागरिकांना घराबाहेर पडता येते, मात्र गटाने वावरता येत नाही.
  • संचारबंदी म्हणजे घरातूनच बाहेर पडता येत नाही.
  • केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडता येईल
  • जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त संचारबंदी लागू करु शकतात.