मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

| Updated on: Oct 19, 2020 | 3:28 PM

राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (CM Uddhav Thackeray Flood Affected Solapur district Press Conference)

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
Follow us on

सोलापूर : “राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित केला आहे. “केंद्रातील सरकार हे देशाचं सरकार आहे. परदेशातील सरकार नाही,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. (CM Uddhav Thackeray Flood Affected Solapur district Press Conference)

“केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. देशाचं सरकार आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन करुन मदतीचं आश्वसन दिलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार, यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“मी सातत्याने माहिती घेत होतो” 

“आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शेतकरी संकटाच्या डोंगरात आहे. त्यामुळे दिलासा आणि धीर देण्यासाठी आलो. अजिबात काळजी करु नका. चिंता करू नका. जे जे करणे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“पाऊस अजूनही पडतोय. धोक्याचा इशारा दिला आहे. संकट टळलेलं नाही. हा परतीचा पाऊस, जाता जाता किती फटका देईल याचा अंदाज आला आहे. सर्व आढावा घेऊन प्रत्यक्ष मदत करणार आहोत. तूर्तास जे लोक दगावले त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य द्यायला सुरुवात केली आहे, “असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“अंदाज घेऊ, महिती घेऊ, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु” 

“घाबरु नका, सावध राहा. त्यामुळे मी म्हणून घोषणा केली नाही. हे करू ते करू, अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु. पंचनामे सुरू आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे संकट अजूनही टळलेलं नाही. धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संकटाचा काळ संपेपर्यंत घाई करता येत नाही. गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतो आहे. दोन तीन दिवस धोका आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray Flood Affected Solapur district Press Conference)

संबंधित बातम्या : 

पुढचे 24 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला