इतर जिल्ह्यांकडून झालेल्या चुका तुम्ही करु नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; पुणे विभागातील कोव्हिड उपाययोजनांचा आढावा 

| Updated on: Sep 03, 2020 | 4:35 PM

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढता संसर्ग लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुणे विभागाचा आढावा घेतला. (CM Uddhav thackeray Meeting on Covid Measures)

इतर जिल्ह्यांकडून झालेल्या चुका तुम्ही करु नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; पुणे विभागातील कोव्हिड उपाययोजनांचा आढावा 
Follow us on

पुणे : राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुणे विभागाचा आढावा घेतला. यात पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कोव्हिड उपाययोजनांचा आढावा घेतला. यात दहा प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. (CM Uddhav thackeray Meeting on Covid Measures In Pune Division)

उद्धव ठाकरेंकडून पुणे विभागातील कोव्हिड उपाययोजनांचा आढावा 

1. पश्चिम महाराष्ट्रात कोव्हिडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब. मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे.

2. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे. कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील, त्या तुम्ही होऊ देऊ नका.

3. इतर देश फक्त कोव्हिड एके कोव्हिडचा मुकाबला करतात. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे.

4. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा. तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा. चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या.

5. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने आपण संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यात घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का ? त्यांचे आरोग्य कसे आहे? त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणे आहेत का? घरात बाहेरुन कुणी व्यक्ती आल्या आहेत काय? मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का, याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. (CM Uddhav thackeray Meeting on Covid Measures In Pune Division)

6. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जनजागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे.

7. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करु नका, गाफील राहू नका.

8. कोरोना विषाणूवर लस येईल, तेव्हा येईल पण कायमस्वरुपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.

9. सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही. इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा.

10. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे. (CM Uddhav thackeray Meeting on Covid Measures In Pune Division)

संबंधित बातम्या : 

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?