शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Oct 21, 2020 | 9:50 PM

शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे त्याला तात्काळ मदत करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

उस्मानाबाद : राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घेऊन केली. (Congress Deligation Meet Cm uddhav thackeray)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या, वीज बिल, पीक कर्ज माफीसह फळबागांना वेगळे पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर, सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह काँग्रेस नेते व मराठवाड्यातील आमदार उपस्थित होते.

मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामध्येच सोयाबीन आहे. तर काहींनी सोयाबीनची कापणी केल्यानंतर वावरातच ठेवले असल्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओढा, नदी काठच्या अनेक गावातील सोयाबीन वाहून गेले आहे.

शेतातील, ऊस, बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, सुर्यफुल, कांदे, तसेच फळभाज्यांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज पडल्यामुळे त्यांना पशुधनास मुकावे लागले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसामुळे रस्ते, रस्त्यावरील पुल, उखडले असून दळणवळणाला अडचण येत आहे. बहुतांश तालुक्यामध्ये पाझर तलाव, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. नॅशनल हायवे नजीकच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.

मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जावून शेतीमाल, शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टी भागातील सर्व जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन लगोलग आर्थिक मदत करावी. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादमध्ये केलेल्या पाहणीनंतर दिली.

उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला.

“मी इथे केवळ आकडे सांगायला आलो नाही. केवळ तुम्हाला बरे वाटावं म्हणून आकड्यांची फेकाफेक करणार नाही. आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 80 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल. तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(Congress Deligation Meet Cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या

 

केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | धीर सोडू नका, हे सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे