‘कोरोना’ संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा

| Updated on: Mar 26, 2020 | 7:34 AM

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी टोलवसुली रद्द करण्यात आली आहे (Nitin Gadkari suspends Toll Collection)

कोरोना संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दिलासादायक घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद राहतील. (Nitin Gadkari suspends Toll Collection)

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. ‘रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील’ असं गडकरींनी स्पष्ट केलं.

संचारबंदी लागू झाल्यामुळे कोणालाही विनाकारण वाहनाने प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणारी वाहतूक यासाठीच प्रवासाला परवानगी आहे.

विशेष म्हणजे खाजगी वाहनात चालक अधिक दोन, तर रिक्षामध्ये चालक अधिक एक इतक्याच प्रवाशांना राज्य सरकारने संमती दिली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 606 वर पोहोचली असून त्यामध्ये 43 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

Nitin Gadkari suspends Toll Collection