नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या जाण्यानं पक्ष थांबत नाही; फडणवीसांचा पलटवार

| Updated on: Oct 21, 2020 | 6:52 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत असल्याचं सांगून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या जाण्यानं पक्ष थांबत नाही; फडणवीसांचा पलटवार
Follow us on

औरंगाबाद: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल, असं सूचक विधान करतानाच कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis reaction on eknath khadse resignation)

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या आरोपांवर भाष्य केलं. नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगलं झालं असतं. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या, असं सांगतानाच मला खडसेंच्या इतर आरोपांवर काहीही बोलायचं नाही. खडसे अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचं नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचं आहे, त्यांनी मला ठरवलं, असं ते म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो की मोठा नेता असो पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही, असा टोला लगावतानाच जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असंही ते म्हणाले.

एकही आमदार जाणार नाही

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपचे नेते आमच्याकडे येतील असं वक्तव्य केलं होतं. खडसेंच्या रुपाने ही सुरुवात झाली आहे का? असा सवाल केला असता ते जे काही म्हणतात ते म्हणू द्या. एकही आमदार भाजपमधून जाणार नाही. सर्व आमदार भाजपसोबतच आहेत, असं फडणवीस म्हणाले.

खोतकरांना कोण विचारतं?

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली आहे, असं पत्रकारांनी विचारताच ज्यांचं काही खरं नाही, ते लोक काहीही बोलत आहेत. खोतकर माझे मित्र आहेत. पण त्यांना कोण विचारतं का पक्षात. त्यांचं काही खरं आहे का?, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis reaction on eknath khadse resignation)

संबंधित बातम्या:

मी आधीच सांगितलं होतं, नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकणार, आता सोबत मिळून काम करणार : गुलाबराव पाटील

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत फेरबदलाचे संकेत, जितेंद्र आव्हाडांना प्रदेशाध्यक्षपद?

देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर अन्याय केला नाही: गिरीश महाजन

(devendra fadnavis reaction on eknath khadse resignation)