शेतकरी कृषी कायद्यासोबतच, राजस्थानमधील पंचायत समितीच्या निकालावरुन स्पष्ट : जावडेकर

| Updated on: Dec 09, 2020 | 3:45 PM

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, राजस्थानमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे विजय मिळविला आहे.

शेतकरी कृषी कायद्यासोबतच, राजस्थानमधील पंचायत समितीच्या निकालावरुन स्पष्ट : जावडेकर
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी (Punjab Farmers) गेल्या दोन आठवड्यांपासून रस्त्यांवर उतरला आहे. या आंदोलनाला देशासह विदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. भाजप व एनडीएतील मित्रपक्षवगळता देशभरातील अनेक पक्षांनी काल (08 डिसेंबर) भारत बंदची हाक दिली. देशभरातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱ्यासोबत उभा राहिला. त्यामुळे देशभरात भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याचे बोलले जात होते. परंतु या चर्चांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हणाले की, “राजस्थानमधील पंचायत समिती निवडणुकांमध्ये (Rajasthan Panchayat Samiti) भाजपने मिळवलेला विजय देशातील शेतकरी आणि सामान्य नागरिक कृषी कायद्यांसोबत असल्याचे स्पष्ट करतो”. (Farmers are with new Agricultural laws, results of the Panchayat Samiti elections in Rajasthan says it all : Prakash Javadekar)

प्रकाश जावडेकर म्हणाले की, राजस्थानमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे विजय मिळविला आहे. ग्रामीण भागातील अडीच कोटी मतदार हे प्रामुख्याने शेतकरी होते, हा त्यांचा निर्णय आहे. या अडीच कोटी शेतकऱ्यांनी भाजपवर विश्वास टाकला आहे. याचाच अर्थ ते कृषी कायद्यांसोबत आहेत.

जावडेकर म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत 636 जागांसाठी मतदान घेण्यात आले, भारतीय जनता पक्षाने त्यापैकी 353 जागा जिंकल्या आहेत. पंचायत समितीच्या 4 हजार 371 जागांपैकी 1990 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 1 हजार 780 जागा खिशात घालता आल्या. याशिवाय 425 पंचायतींमध्ये अपक्षांनी विजय मिळवला. आरएलपीने 56, माकपने 16, बसपने तीन, तर राष्ट्रवादीने एका पंचायत समितीवर झेंडा रोवला.

दुसरीकडे, जिल्हा परिषदांच्या 636 जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने 353 जागा जिंकल्या, तर काँग्रेस 252 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. आरएलपी 10, तर 18 अपक्षांनी जिल्हा परिषदेत जागा पटकावल्या आहेत. भाजप 14 जिल्हा परिषदांमध्ये आपला अध्यक्ष बसवण्यात यशस्वी ठरली, तर केवळ पाचच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला. ब्लॉक पंचायतीच्या 222 जागांपैकी भाजपाला 93 जागांवर बहुमत मिळालं आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अधिक यश मिळते असा ट्रेंड राहिला आहे, परंतु यावेळी हा ट्रेंड उलटा आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे, परंतु मतदारांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. या निवडणुकीत आमच्या विरोधकांनी पैशाचा जोरदेखील दाखवला, परंतु त्यांचे काहिही चालले नाही. 2.5 कोटी मतदारांपैकी सर्वच शेतकरी होते, म्हणजेच राजस्थानातील कोट्यवधी शेतकरी कृषी सुधारणा विधेयकाच्या बाजूने आहेत.

प्रकाश जावडेकर म्हणाले की, यावेळी राजस्थानमधील निवडणुकीतील आमचा विजय आणि त्यांच्या पराभवातील अंतर खूप जास्त होते. सचिन पायलट यांच्या टोंक जिल्ह्याची जिल्हा परिषद भाजपने काबीज केली आहे. त्यांच्या चार मंत्र्यांच्या क्षेत्रातील जिल्हा परिषदा आम्ही काबीज केल्या आहेत. येणाऱ्या काळातील मतदारांचा कौल कोणत्या दिशेने असणार, हेदेखील आजच्या निवडणुकीवरुन स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

शेतकरी आंदोलन Live Update | केंद्र सरकार कृषी कायद्यांवर ठाम, शेतकऱ्यांना लेखी प्रस्ताव देणार

राजस्थानात भाजपचा काँग्रेसला ‘दे धक्का’, पाच मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्राचा सुधारित प्रस्ताव, कोणकोणत्या मागण्यांवर सहमती?

(Farmers are with new Agricultural laws, results of the Panchayat Samiti elections in Rajasthan says it all : Prakash Javadekar)