लेखणी बंद आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका, राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

| Updated on: Sep 30, 2020 | 8:17 AM

राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (Final Year Exam Postponed Due To University Staff Strike)

लेखणी बंद आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका, राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Follow us on

मुंबई : सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजना इत्यादी मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील 14 विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्‍यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. (Final Year Exam Postponed Due To University Staff Strike)

राज्यातील 14 विद्यापीठांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 17 हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा संकटात सापडल्या आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासोबतच इतर काही विद्यापीठांकडूनही या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विद्यापीठांमध्ये एटीकेटीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या सोमवारी (28 सप्टेंबर) उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सामंत यांनी विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगापासून आश्वासित प्रगती योजना संदर्भात निर्णय घेतला जाईल. येत्या एका महिन्यातच अंमलबजावणी केली जाईल.  त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हे लेखणीबंद आंदोलन तात्काळ मागे घ्यावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले होते.

मात्र त्या बैठकीनंतरही या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी हे लेखणीबंद आंदोलन सुरु ठेवले आहे. त्यामुळे आता सरकारने यासाठीचे परिपत्रकच काढावे, अशी मागणी राज्यातील विद्यापीठ अधिकारी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

यानुसार आज मुंबईतील कलिना आणि फोर्ट संकुलात लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून दिवसभर निदर्शने केली जाणार आहेत. त्यासोबतच राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ शिक्षक अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीचे प्रमुख दीपक घोणे यांनी दिली. (Final Year Exam Postponed Due To University Staff Strike)

संबंधित बातम्या :

Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल