Dada Bhuse | शेतकरी बनण्याची नौटंकी! दादा भुसेंची धाड पूर्णपणे मॅनेज, माजी कृषीमंत्र्यांचा आरोप

| Updated on: Jun 22, 2020 | 4:10 PM

दादाजी भुसे यांनी बियाणांच्या दुकानात टाकलेली धाड ही पूर्णपणे मॅनेज होती, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

Dada Bhuse | शेतकरी बनण्याची नौटंकी! दादा भुसेंची धाड पूर्णपणे मॅनेज, माजी कृषीमंत्र्यांचा आरोप
Follow us on

अमरावती : नाटक नौटंकी करण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत (Anil Bonde Criticize Dadaji Bhuse) माजी कृषीमंत्री अनिल बोडें यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यावर टीका केली आहे. एका ठिकाणी धाड टाकल्याने काही फरक पडत नाही, दक्षता अधिकारी काय करतात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असं अनिल बोंडे म्हणाले. तसेच, दादाजी भुसे यांनी बियाणांच्या दुकानात टाकलेली धाड ही पूर्णपणे मॅनेज होती, असा आरोप अनिल बोंडे (Anil Bonde Criticize Dadaji Bhuse) यांनी केला.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल (21 जून) शेतकरी बनून युरिया खतं मिळत नसल्याचं स्टिंग ऑपरेशन करत पोलखोल केली. शेतकऱ्यांना खतं, बियाणे मिळतात की नाही हे पाहण्यासाठी दादाजी भुसे शेतकरी बनून औरंगाबादेतील एका दुकानात गेले. त्यावेळी त्या दुकानदाराने खते शिल्लक असतानाही देण्यास नकार दिला. यानंतर स्वत: कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला.

दादाजी भुसे यांच्या याच स्टिंग ऑपरेशनवरुन अनिल बोंडे यांनी कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला. कृषीमंत्री नाटक नौटंकी करतात, त्याला काहीही अर्थ नाही. ही धाड पूर्णपणे मॅनेज होती असा आरोप अनिल बोंडेंनी कृषीमंत्र्यांवर केला.

Anil Bonde Criticize Dadaji Bhuse

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत कृषीमंत्र्यांनी औरंगाबादला अचानक भेट दिली. यानंतर जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे 10 गोणी युरिया मागितला. मात्र, त्या दुकानदाराने युरिया शिल्लक नाही असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी 10 ऐवजी पाच गोण्यांची मागणी केली, मात्र तरीही त्या दुकानदाराने युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर कृषीमंत्र्यांनी दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरिया शिल्लक असल्याचं दुकानदाराच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, त्याच्याकडे स्टॉक रजिस्टरची मागणी केली. तेव्हा त्या दुकानदाराने ते घरी असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरं दिली.

त्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही, यावर दादाजी भुसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यानंतर दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर त्या दुकानात युरियाच्या 1386 पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषीमंत्र्यांचा दुकानदारांना इशारा

अशा दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला. तसेच, गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शिवाय, औरंगाबादेतील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेशही कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

Anil Bonde Criticize Dadaji Bhuse

संबंधित बातम्या : 

कॅन्सरने मुलगा हिरवला, पत्नीचं सोनं विकून पेरणी, बैलाऐवजी स्वत:ला जुंपून मशागत

भाजपात संघटनात्मक फेरबदलाचे संकेत, मेधा कुलकर्णी, बावनकुळेंना नवी जबाबदारी?