कुठे रिक्षांचे चाक थांबले, तर कुठे बाटलीत पेट्रोल देण्यावर बंदी, महाराष्ट्रात युद्धाच्या झळा, तुमच्या शहराची स्थिती काय?

इस्राईल-इराण युद्धामुळे महाराष्ट्रात इंधन संकट ओढावले आहे. नाशिकमध्ये ७५ रुपये तर संभाजीनगरमध्ये ८१ रुपयांवर एलपीजी पोहोचला असून, धाराशिवमध्ये सुट्या इंधन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

कुठे रिक्षांचे चाक थांबले, तर कुठे बाटलीत पेट्रोल देण्यावर बंदी, महाराष्ट्रात युद्धाच्या झळा, तुमच्या शहराची स्थिती काय?
rickshaw taxi
| Updated on: Mar 11, 2026 | 9:57 AM

सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. पश्‍चिम आशियातील इस्राईल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता महाराष्ट्रातील इंधन बाजारावर उमटू लागले आहेत. राज्याच्या विविध भागांत ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकमध्ये गेल्या २४ तासांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नाशिकमध्ये एलपीजीचा दर ७४.९५ रुपये प्रति लीटर वर पोहोचला आहे. अनेक पंपांवर दरवाढीच्या सूचना आधीच लावण्यात आल्या आहेत. गॅस संपण्याच्या भीतीने रिक्षाचालक रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. यामुळे शहरात रिक्षांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा कमी आहे, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे फलक पंप चालकांनी लावले आहेत.

संभाजीनगरमधील स्थिती अधिक चिंताजनक

छत्रपती संभाजीनगरमधील स्थिती अधिक चिंताजनक आहे. अवघ्या तीन दिवसांत ऑटो एलपीजीचे दर ६१ रुपयांवरून थेट ८१ रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत. गॅसचा साठा संपल्याने शहरातील सुमारे ८ मोठे एलपीजी पंप पूर्णपणे बंद झाले आहेत. रिक्षाचालकांनी या दरवाढीवर तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

इंधनाचा साठा राखीव ठेवण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पेट्रोल पंपावर कॅन किंवा बाटलीमध्ये सुटे पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ शासकीय वाहने आणि जीवनावश्यक सेवांसाठी साठा राखीव ठेवला जाणार आहे. शेतीकामासाठी डिझेल नेणाऱ्या ट्रॅक्टर धारकांना आता थेट ट्रॅक्टर पंपावर घेऊन जावा लागणार आहे. यामुळे शेतीच्या कामांना मोठा ब्रेक लागला आहे.

विशेष तपासणी पथके तैनात

कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परिस्थितीचा आढावा घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज २८ हजार सिलेंडरची मागणी असून पुरवठा सुरळीत आहे. केंद्राच्या सूचनेनुसार कंपन्यांनी उत्पादन वाढवले आहे. हॉटेल आणि इतर व्यावसायिक वापरासाठी सध्या गॅस पुरवठा केला जाणार नाही. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर टाळण्यासाठी विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच पॅनिक होऊन बुकिंग करू नये आणि साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Us