मुंबई : ज्येष्ठ आणि ख्यातनाम लेखिका गिरीजा कीर (Girija Keer passed away) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मुंबईत त्यांनी (Girija Keer passed away) अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. गिरीजा कीर यांच्या निधनाने साहित्य विश्वातील परखड पण तितकीच मर्मभेदी लेखिका हरपल्याची भावना आहे.
गिरीजा कीर यांचा जन्म धारवाड इथे 5 फेब्रुवारी 1933 रोजी झाला. (संदर्भ विकीपीडिया). त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीएची पदवी मिळविल्यानंतर लेखनाला सुरुवात केली. विविध विषयात व्यासंग असलेल्या गिरीजा कीर यांनी अनेक पुस्तकं लिहिली. कीर यांनी कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी वैविध्यपूर्ण लिखाण केलं.
गिरीजा कीर यांच्या लोकप्रिय कांदबऱ्यांमध्ये गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला यांचा समावेश होतो.
गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करत होत्या.
महत्त्वाचं म्हणजे गिरीजा कीर यांनी येरवडा तुरुंगातील कैद्यांचा अभ्यास करुन लिहिलेली जन्मठेप ही कादंबरी चांगलीच लोकप्रिय ठरली.