शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार

| Updated on: Nov 12, 2020 | 10:12 AM

जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदतनिधीचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. |

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार
Follow us on

सोलापूर: निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. (Heavy Rain affected farmers will get govt aid in two days)

जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.

जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदतनिधीचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित खातेदारांच्या खात्यात पैसे शनिवारपर्यंत जमा होतील, असे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवून परवानगी मिळवली होती.

‘राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, पण केंद्राचे पथक महाराष्ट्रात फिरकलेच नाही’

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी बुधवारी उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज 18 दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकलेले नाही. विरोधक यावर चकार शब्दही बोलत नाहीत, नक्की काय गौडबंगाल आहे? कुठे गेले केंद्राचे पथक आणि कुठे गेले विरोधक?, असे वडेट्टीवार यांनी विचारले. तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे पथक अजूनही आलेच नाही, आता विरोधक गप्प का?: विजय वडेट्टीवार

शेतकरी मदतीला निवडणूक आयोगाची परवानगी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

(Heavy Rain affected farmers will get govt aid in two days)